• Wed. Mar 11th, 2026

    धारावीच्या मोर्चापासून ते किणी प्रकरणापर्यंत सगळंच काढलं, शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    धारावीच्या मोर्चापासून ते किणी प्रकरणापर्यंत सगळंच काढलं, शर्मिला ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

    मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे कंत्राट अदानी समूहाला देण्याच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली नुकताच मोर्चा काढण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांच्या या मोर्चानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: मैदानात उतरत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचे बाण सोडले होते. अदानी यांच्याशी सेटलमेंट न झाल्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्याकडून हा मोर्चा काढण्यात आला, असा गंभीर आरोप अप्रत्यक्षरित्या करण्यात आला होता. त्याला उद्धव ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिले होते. ‘धारावी बचाव’ मोर्चावर आक्षेप घेणारी ही मंडळी अदानींचे चमचे आहेत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांची ही लढाई आणखीनच तीव्र झाली होती. अशातच आता या वादात मनसेप्रमुख राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी उडी घेतली आहे. त्या सोमवारी मनसेच्या लालबागमधील शाखेच्या वर्धापन दिनाला उपस्थित होत्या. यावेळी शर्मिला ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांना टोले लगावले.

    उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं तेव्हा धारावी बद्दल का निर्णय घेतले नाहीत? सरकार आल्यानंतर काही महिन्यांनी कोरोना आला. त्यावेळी तुमचं सरकार असताना तुम्ही का निर्णय घेतले नाहीत? तुम्हाला कोणी अडवलं होतं? धारावीचा पुनर्विकास करायचा होता तर तुमचं सरकार असताना करून टाकायचा, कोणी तुमचे हात धरले होते, असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. राज्यात मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र, तुमचं सरकार असताना तुम्ही आरक्षणाचे विधेयक विधानसभेत का मंजूर केलं नाही? हा प्रश्न तर कोरोना काळात सुरू झाला नव्हता. मराठा समाजाच्या आरक्षणाचे मोर्चे वर्षानुवर्षे निघत आहेत. मग तुम्ही त्यांना आरक्षण का दिलं नाही? असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला विचारला.

    सेटलमेंट होत नव्हती म्हणून मोर्चा होता का? विरोधकांची टीका, उद्धव ठाकरे म्हणाले, होय, आमच्यासोबत भाजप नव्हतं ना..!

    संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी मानले होते आभार

    शर्मिला ठाकरे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी वरून आदित्य ठाकरे यांची पाठराखण केली होती. त्यावरून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले होते. यासंदर्भात बोलताना शर्मिला ठाकरे म्हणाल्या, रमेश किणी केसपासून आजपर्यंत त्यांनी फक्त चिमटे काढण्याचेच काम केलं. आपला लहान भाऊ म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता. थोडा जरी विश्वास दाखवला असता तरी आम्हाला त्यांचे आभार मानण्याची संधी मिळाली असती, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटले.

    पुतण्याच्या पाठीशी काकू खंबीरपणे उभी, दिशा सालियनच्या मृत्यूच्या आरोपांवरून शर्मिला ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

    मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला. मी म्हणाले, आदित्य असं करेल असं मला वाटत नाही. पण तुम्ही ज्या भावाबरोबर लहानाचे मोठे झालात, त्या भावावर थोडा तरी विश्वास दाखवायला हवा होता. तुम्ही संधी मिळेल तेव्हा किणी केसवरून टोमणे मारायचे सोडत नाहीत. त्या भावावर विश्वास दाखवून मदत करायला हवी होती. मग आम्हीही त्यांचे आभार मानले असते, असेही शर्मिला ठाकरे यांनी म्हटले.

    दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ, SIT चा प्रश्न विचारताच चुलती पुतण्याच्या खंबीरपणे पाठीशी

    सुरूर-वाई-महाबळेश्वर-पोलादपूर या महामार्गासह पाचगणी ते महाबळेश्वर रस्त्यांच्या कामांना गती द्या- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले – महासंवाद
    नागपूर नवीन विधानभवनचे काम विहित कालावधीत पूर्ण करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद
    येवला औद्योगिक वसाहतीमध्ये मूलभूत सोयीसुविधांची तत्परतेने  उपलब्धता करावी – अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed