मुंबई,दि.११–जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेतंर्गत सुरू असलेली येवला तालुक्यातील राजापूर सह ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, धुळगांव सह १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, लासलगाव विंचूर सह १६ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या पाणीपुरवठा योजनांची उर्वरित कामे तातडीने पूर्णत्वास नेण्याचे निर्दैश अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीत दिले.
मंत्रालयात प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामांच्या आढावा बैठकीत मंत्री भुजबळ यांनी संबंधितांना सूचित केले. या बैठकीस आमदार पंकज भुजबळ,माजी खासदार समीर भुजबळ, येवला नगर परिषदेचे नगराध्यक्ष राजेंद्र ग लोणारी, पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष जयदत्त होळकर,कृषी उत्पन्न बाजार समिती येवलाचे सभापती वसंत पवार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता संतोष गव्हाणकर, अधिक्षक अभियंता सुबोध मोरे, कार्यकारी अभियंता स्नेहांकुश चिकोडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आर.व्ही.महाजन, स्थानिक पदाधिकारी मोहन शेलार,ज्ञानेश्वर दराडे, भगवान ठोंबरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, जलजीवन मिशन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतंर्गत सुरू असलेली कामे विहित मुदतीत पूर्ण होतील याची खबरदारी यंत्रणांनी घ्यावी. कामांना विलंब करत असलेल्या कंत्राटदारांकडून नियमानुसार दंड वसूल करावा.तसेच मंजूर कामांसाठीचा निधी तत्परतेने मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही सर्व संबंधितांनी गतीने करावी. त्याचप्रमाणे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील जल जीवन मिशन अंतर्गतची कामे ही तातडीने पूर्ण करण्यात यावी,असे निर्देश मंत्री भुजबळ यांनी दिले.
००००
वंदना थोरात/वि.सं.अ
