आम्हाला ओबीसी मधून आरक्षण न घेता मराठा समाजाला वेगळे आरक्षण हवं आहे, अशी भूमिका शिवसेना नेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसीला हात लावणार नाही असे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी समजून घेत उगाचच मोर्चा काढण्यात अर्थ नाही हे समजून घेतलं पाहिजे.
मनोज जरांगेंनी थांबायला हवं, भुजबळ यांनीही थांबलं पाहिजे. एकामेकांना अरे तुरे अशी भाषा करण्यापेक्षा कुठेतरी आपण सामंजस्याची भूमिका घेऊन थांबलं पाहिजे. मोर्चे काढून महाराष्ट्राचे वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण सामंजस्याची भूमिका मांडली पाहिजे, असं कदम म्हणाले.
मराठा आरक्षणासंदर्भात आम्हाला ओबीसीच्या भरलेल्या ताटातलं आरक्षण न घेता ५० टक्के पेक्षा जास्त कसे देता येईल हा आमचा प्रयत्न आहे. आमदार योगेश कदम यांनी विधिमंडळात या संदर्भात भाषण केलं आहे आणि महाराष्ट्र राज्यात आर्थिक सर्वे करायला लागेल. मराठा समाज आर्थिकदृष्ट्या मागास आहे ही गोष्ट आपण माननीय सुप्रीम कोर्टाला जेव्हा पटवून देऊ त्या दिवशी आपल्याला ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून मराठा आरक्षण मिळेल. या विषयात तुम्ही महाराष्ट्र शासनाला धमक्या देऊ नका लक्षात ठेवा आम्ही पण मराठेच आहोत असे रामदास कदम म्हणाले.
मनोज जरांगे यांचे अभिनंदन आहे त्यांच्यामुळं मराठ्यांच्या कुणबी नोंदी होत्या त्या शोधून काढल्या गेल्या. तुम्ही चांगलं काम केलं असं कौतुक रामदास कदम यांनी केलं आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होता नये तुटेपर्यंत ताणता कामा नये अशीही सामंजस्याची भूमिका त्यांनी मांडली.
मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आहे याची जाणीव ठेवावी, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. या विषयात सारख्या तारखा देणे हे चुकीचं आहे, असे स्पष्ट मत कदम यांनी व्यक्त केलं. तामिळनाडू राज्याने जसं आरक्षण दिलं आहे तसेच आपल्यालाही सुप्रीम कोर्टात जाऊन ५० टक्क्यांपेक्षा अधिकच आरक्षण मागावं लागेल. हे सुप्रीम कोर्टाला पटवून द्यावं लागेल. ओबीसी समाजाच्या कोणत्याही आरक्षणाला हात न लावता वेगळं आरक्षण मराठा समाजाला द्यायचं आहे. ही शासनाची भूमिका मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यापूर्वी स्पष्ट केल्याचं कदम यांनी सांगितलं.
Read Latest Maharashtra News And Marathi News