• Sat. Sep 21st, 2024

बळीराजाला कांद्यानं रडवलं; दरांतील उतार थांबेना, नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये ५०० रुपयांनी घसरले भाव

बळीराजाला कांद्यानं रडवलं; दरांतील उतार थांबेना, नाशिकच्या बाजार समित्यांमध्ये ५०० रुपयांनी घसरले भाव

म. टा. वृत्तसेवा, मनमाड : कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ तसेच दर घसरल्याने संतप्त शेतकऱ्यांनी बुधवारी मालेगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन केले. अचानक झालेल्या या आंदोलनाने पोलिसांची धावपळ उडाली, तर मालेगाव, चांदवडकडे जाणारे मार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली. अर्ध्या तासानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वाहतूक सुरळीत झाली.

बुधवारी मनमाड बाजार समितीत कांद्याच्या भावात घसरण झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत मालेगाव चौफुली वर धाव घेऊन रास्ता रोको आंदोलन केले. कांद्याला भाव मिळाला पाहिजे, निर्यातबंदी मागे घ्या, अशा घोषणा दिल्या. यामुळे चांदवड तसेच मालेगावकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर रास्ता रोको मागे घेण्यात आले. रास्ता रोकोनंतर मनमाड बाजार समितीत येऊन शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या दिला. माजी आमदार संजय पवार, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, किशोर लहाने, कैलास भाबड आदी यावेळी उपस्थित होते. ठिय्या आंदोलनानंतर एक वाजता कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू झाले. यावेळी कमाल २२०० व सरासरी दोन हजारांचा दर मिळाला.

झोडगे-मुंगसेतही रास्ता रोको
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव : बुधवारी (दि. १३) कांदा दरात झालेल्या घसरणीमुळे झोडगे व मुंगसे येथील कांदा लिलाव संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडले, तसेच महामार्गावर काहीकाळ रास्ता रोको आंदोलन केले.

निर्यातबंदीमुळे बाजार समित्या बंद होत्या. मात्र, त्यानंतर लिलाव सुरू झाल्यानंतर कांदा दरात सरासरी एक हजार रुपयांची घसरण झाली होती. बुधवारी मात्र २३०० रुपयांचा प्रतिक्विंटल दर मिळाला. दोन दिवसांच्या तुलनेत ७०० ते ८०० रुपयांनी कांदा घसरल्याने शेतकरी संतप्त झाले. दुपारच्या सत्रात लिलाव सुरू होताच शेतकऱ्यांनी ते बंद पाडले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली, पण दर रोजच्या रोज कमी होत असतील तर आर्थिक नुकसान सोसावे कसे, असा सवाल करीत शेतकऱ्यांनी झोडगे तसेच मुंगसे येथे महामार्गावर रास्ता रोको केला. शेतकऱ्यांनी आपली वाहने महामार्गावर आणली होती. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिस निरीक्षक रवी मगर यांनी पथकासह दोन्ही ठिकाणी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली व लिलाव पूर्ववत सुरू झाले.

चांदवडला आठवड्यात दीड हजाराची घसरण
चांदवड : निर्यातबंदीच्या निर्णयानंतर बंद असलेल्या कांदा लिलावास बुधवारी (दि. १३) चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरुवात झाली. मागील गुरुवारच्या तुलनेत सरासरी दीड हजाराची घसरण दिसून आली. बुधवारी सकाळच्या सत्रात ९ हजार क्विंटल कांद्याचे लिलाव पुकारण्यात आले. ४३१ पिकअप आणि १०१ ट्रॅक्टर ट्रॉलींमधून शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणला होता. कांद्याला किमान ९१२, कमाल २३१८ तर सरासरी १८५० रुपये दर मिळाला. गोलटीला किमान ३००, कमाल २००३ तर सरासरी एक हजार रुपये दर मिळाला. उन्हाळ कांद्यास एक हजार ते २,६७२ रुपये दर मिळाला.
पूर्ववत लिलाव, पण भावाचा अभाव; नाशिक जिल्ह्यात दर पडल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
लासलगावला पाचशेंची घसरण
निफाड : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्यामुळे कांद्याचे भाव कमी होऊन उत्पादकांचे आर्थिक नुकसान होईल, ही भीती खरी ठरत असून कांद्याच्या दरात घसरण सुरूच आहे. बुधवारी लासलगाव बाजार समितीत लाल कांद्याचे दर दोन दिवसांत ५०० रुपयांनी घसरल्याने दिसून आले. सोमवारी किमान १२५१, कमाल २६११ तर सरासरी २२६० रुपये दर होते. बुधवारी किमान ७००, कमाल २२७० तर सरासरी १९०० रुपयांचा दर मिळाला. सोमवारच्या तुलनेत लाल कांद्याचे दर ४०० ते ५०० रुपयांनी घसरले आहेत. केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्यानंतर गेल्या १५ दिवसांत कांद्याचे भाव निम्म्याहून अधिक घसरले आहेत. १ डिसेंबर रोजी लाल कांद्याला सरासरी ३५०० रुपये दर होते. आता ते १९०० रुपयांवर आले आहेत. लासलगाव बाजार समितीत बुधवारी १५ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

येवल्यात साडेचारशेची घसरण
येवला : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्यानंतर येथील बाजार समितीत दिवसागणिक कांदा बाजारभावात घसरण होत आहे. सोमवारच्या तुलनेत बुधवारी लाल कांद्याच्या सरासरी दरांत क्विंटलमागे ४५० रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांत नाराजी आहे. सोमवारी किमान ५०० ते कमाल २३७० (सरासरी २०५०) असा दर मिळाला होता. मंगळवारी लिलाव बंद होते. बुधवारी बाजार समितीत ५५० ट्रॅक्टर व २०० रिक्षा, पिकअपमधून सुमारे १३ हजार क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. त्याला किमान ५०० ते कमाल २०७५ (सरासरी १६००) रुपये बाजारभाव मिळाला. सोमवारच्या तुलनेत बुधवारी कांदा बाजारभावात सरासरी ४५० रुपये, तर कमाल बाजारभावात ३०० रुपयांची घसरण झाल्याचे दिसून आले.

‘एनसीसीएफ’च्या खरेदीतही सव्वादोनशेची घसरण
नाशिक : कांद्याचे दर आटोक्यात आणण्यासाठी केंद्राने निर्यातबंदी केली खरी; पण त्यास वाढता विरोध विचारात घेता बफर स्टॉकसाठी दोन लाख टन कांदा खरेदीची घोषणा केंद्रीय सचिव रोहितकुमार सिंह यांनी केली. यानंतर भारतीय राष्ट्रीय ग्राहक संघाने (एनसीसीएफ) जिल्ह्यात काही केंद्रांवर मंगळवारी करण्यात आलेल्या कांदा खरेदीत क्विंटलला सरासरी तीन हजार रुपयांचा दर देण्यात आला होता. बुधवारी त्यात २२७ रुपयांची घसरण होऊन तो २७७३ रुपयांपर्यंत आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed