वसई-विरार महापालिका हद्द तसेच वसईच्या ग्रामीण भागातून मुंबई-अहमदाबाद महामार्ग गेला आहे. गुजरात आणि मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी हा महत्त्वाचा महामार्ग आहे. मात्र महामार्गालगत झालेली अनधिकृत बांधकामे, माती भराव यांमुळे यंदाच्या पावसाळ्यात महामार्गावर अनेक दिवस, मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. यामुळे प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. पाणी तुंबण्याच्या जोडीलाच, महामार्गावर मोठमोठे खड्डेदेखील पडले होते. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत होती. यामुळे अपघातही होत होते. खड्डे आणि पाणी तुंबण्याची ही समस्या दरवर्षी पावसाळ्यात उद्भवत असल्याने, यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली होती. पालघरचे खासदार राजेंद्र गावित, वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, भाजपचे मनोज पाटील आणि वसईतील भूमिपुत्र फाउंडेशननेही या महामार्गाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची आणि काँक्रीटीकरण करण्याची मागणी केली होती. मात्र या कामासाठी मुहूर्त मिळत नव्हता.
मागील महिन्यात वसईत एका कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालत, महामार्गाचे काम महिन्याभरात सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार ५ डिसेंबरपासून महामार्गावर खानिवडे टोलनाक्यापासून मुंबईच्या दिशेने काम सुरू झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला शब्द वेळेत पूर्ण केला आणि एक महिन्यात काम सुरू झाले, याबद्दल वसईकरांनी त्यांचे आभार मानले आहेत. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणीदेखील त्यांनी केली आहे.
असे असेल मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे काम-
– महामार्गाच्या महाराष्ट्राच्या हद्दीतील संपूर्ण १२१ किमीचे काँक्रीटीकरण करणार
– पाण्याचा निचरा होण्यासाठी नाले, कल्वर्ट नव्याने बांधणार
– महामार्गावर तीन अंडरपास
– पथदिवे, तसेच १० पादचारी पुलांची उभारणी करणार
– यासाठी ६०० कोटींचा खर्च अपेक्षित
