• Sat. Sep 21st, 2024

महिलांसाठी पुणे असुरक्षितच, विनयभंग-अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ,अल्पवयीन मुलींना अधिक धोका

महिलांसाठी पुणे असुरक्षितच, विनयभंग-अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये वाढ,अल्पवयीन मुलींना अधिक धोका

म. टा. प्रतिनिधी, पुणे: देशात महिला अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण वाढत असतानाच या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. राज्यात गेल्या वर्षी ४५ हजार ३३१ गुन्हे दाखल झाले असून, सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत. पुणे राज्यात चौथ्या स्थानी असून, शहरात गेल्या वर्षी २०७४ गुन्हे दाखल झाले.

देशभरातील गुन्ह्यांची सद्यस्थिती दर्शविणारा ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवाल’ नुकताच प्रसिद्ध झाला. देशात मुली, महिलांचे अपहरण, महिलांचा छळ, विनयभंग, बलात्कार, आत्महत्येस प्रवृत्त करणे, महिलांवरील हल्ले आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या वर्षी (२०२२) महिलांवरील अत्याचाराचे चार लाख ४५ हजार ७७ गुन्हे दाखल झाले. पैकी सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये दाखल असून, त्याखालोखाल राजस्थानचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे मोठ्या शहरांमध्ये घडत असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविले आहे. राज्यात सर्वाधिक सहा हजार १७६ गुन्हे मुंबईत दाखल आहेत. ठाण्यात दोन हजार ३४१, नगरमध्ये दोन हजार २०२ आणि पुण्यात २,०७४ गुन्हे दाखल आहेत. पुणे जिल्ह्यात एक हजार ८४४ गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

चेष्टेत कॉम्प्रेसर पाईपमधील हवा पोटात सोडल्याने मुलाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यात अल्पवयीन मुलींना धोका

महिला आणि तरुणींना जाळ्य़ात ओढून त्यांचे अपहरण करण्याचे सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दाखल आहेत. उत्तर प्रदेशात महिला अपहरणाचे ३९ हजार ३७२ गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्रात १८ हजार ७२४ गुन्हे दाखल असून, पुणे शहरात १,१३९ गुन्हे घडले आहेत. मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरात अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळय़ात ओढून पळवून नेण्याचे प्रकार वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

महिलांचा छळ महाराष्ट्रात अधिक

महिलांचा छळ करून त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणाचे सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रात दाखल आहेत. २०२२मध्ये राज्यात ९२७ गुन्हे दाखल झाले आहेत. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये अनुक्रमे ७५८ आणि ४५६ गुन्हे घडले आहेत. कौटुंबिक छळामुळे महिला आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. महिलांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नातेवाइकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Pune Crime : प्रेम करून लग्न केलं पण…; तरुणीचा घरातच आढळला मृतदेह, आईने सांगितलं भयंकर सत्य

पुण्यात विनयभंगाचे ४७४ गुन्हे

विनयभंग आणि महिलांशी अश्लील वर्तनाचे प्रकार वाढत आहेत. आंध्र प्रदेशनंतर महाराष्ट्रात विनयभंग प्रकरणी सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. देशातील प्रमुख महानगरांत विनयभंग केल्याप्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा विचार केल्यास २०२२मध्ये मुंबईत सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. मुंबईत १८५९ आणि पुण्यात ४७४ गुन्हे दाखल आहेत.

नागपूर महिलांसाठी सुरक्षित

मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नागपूर महिलांसाठी सुरक्षित शहर म्हणून उदयास आले आहे. आकडेवारीनुसार, मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत नागपुरात महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या कमी आहे. गेल्या वर्षी (२०२२) नागपूरमध्ये ११५ बलात्काराच्या घटनांची नोंद झाली होती. गेल्या वर्षी पुण्यात ३०५ बलात्कारांचे गुन्हे नोंदवले गेले.

महिला अत्याचारांत मुंबई ‘अव्वल’

मुंबई ६,१७६

ठाणे २,३४१

नगर २,२०२

पुणे २,०७४

पुणे जिल्हा १,८४४

दोघांनी धक्का दिला तरी पडाल, मजबूत व्हा; अजित पवारांचा महिला पोलिसांना सल्ला

Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed