• Sat. Sep 21st, 2024

आता डोळ्यांत पाऊस! नाशिक जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवरील पिके आडवी, द्राक्षाला सर्वाधिक फटका

आता डोळ्यांत पाऊस! नाशिक जिल्ह्यात ३३ हजार हेक्टरवरील पिके आडवी, द्राक्षाला सर्वाधिक फटका

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जिल्ह्यात रविवारी झालेल्या गारपिटीने द्राक्ष, गहू, भात व कांद्यासह भाजीपाल्याची तब्बल ३३ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके आडवी झाली. चालू वर्षात मार्च-एप्रिल महिन्यातही शेतीस अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यातून खरिपाच्या हंगामात सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या बळीराजाला दुष्काळाचा सामना करावा लागला. तर, रब्बीवर थोडीफार मदार राखणाऱ्या बळीराजाचे या गारपिटीच्या आघाताने तोंडचे पाणी पळाले आहे.

जिल्ह्यात नाशिक शहरासह जिल्ह्यातील देवळा व मालेगाव वगळता इतर तेरा तालुक्यांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. प्राथमिक टप्प्यात ३२ हजार ८३२.५२ इतक्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे कृषीविभागाने म्हटले आहे. पावसाचे वातावरण ओसरल्यानंतर प्रत्यक्ष नुकसान समोर येणार आहे. पावसाच्या फटक्याने मका, सोयाबीन, भात, भाजीपाला, कांदा, कांद्याच्या रोपवाटीका, गहू, टोमॅटो, ऊस, द्राक्ष, सीताफळे, डाळींब आदी पिकांचे अतोनात नुकसान झाले. यातही द्राक्षासह कांदा, गहू, भात आदी पिकांच्या नुकसानीची आकडेवारी मोठी आहे.

१२ हजार हेक्टर द्राक्षबागा पाण्यात

जिल्ह्यात निफाड, लासलगाव, दिंडोरी, चांदवडसह त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यास या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. जिल्ह्यात ११ हजार ५९७ हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागांचे नुकसान झाले. यात एकट्या निफाड तालुक्यातून ६८७० हेक्टरवर नुकसान नोंदविले गेले. यापाठोपाठ दिंडोरीत २ हजार ५३२ हेक्टरवर द्राक्षबागांना फटका बसला.
रब्बीच्या स्वप्नावर कोसळले आभाळ; नाशिक जिल्ह्यात पावसाचा धिंगाणा, गारपिटीने पिकांची माती
कांदा आणखी संकटात

द्राक्षाखालोखाल कांद्यालाही मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात १० हजार ४०८ हेक्टरवर कांद्याचे नुकसान झाले. चांदवड तालुक्यात ५५०० हेक्टरवरील कांदा खराब झाला. या पाठोपाठ नांदगावमध्ये ३१९८ हेक्टर, तर निफाडमध्ये १०७३ हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाले. अवकाळीमुळे ६ हजार ७२९ हेक्टरवर भातशेतीचे नुकसान झाले. इगतपुरीत ५,३४९ हेक्टरवरील भातशेती पाण्यात गेली. याशिवाय नाशिक, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी या तालुक्यांतील भातशेतीलाही चांगलाच फटका बसल्याने भात उत्पादक शेतकरीही आर्थिक संकटात सापडला आहे. याशिवाय, जिल्ह्यात भाजीपाल्याचे ४८८ हेक्टरवर नुकसान झाले आहे.

पाऊणलाख शेतकऱ्यांना मनस्ताप

जिल्ह्यात मालेगाव आणि देवळ्यातील बहुतांश भाग वगळता उर्वरित १३ तालुक्यांमधील सुमारे ८९० गावांमधील ६७ हजार ८६६ शेतकऱ्यांना अवकाळीमुळे मनस्ताप भोगावा लागला. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालेल्या गावांमध्ये चांदवड, निफाड, इगतपुरी, कळवण, नांदगाव आदी तालुक्यांचा समावेश आहे. चांदवडमध्ये अवघ्या ३० गावांमध्ये १९ हजार ४७० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर, निफाडमध्ये १०२ गावांमध्ये १३ हजार ८३२ शेतकरी, इगतपुरीत १२२ गावांमध्ये ११ हजार १२१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed