सोलापूर येथील अक्कलकोट येथून दर्शन घेऊन येणाऱ्या तवेरा या चारचाकी वाहनाचा (एम एच् ४१ व्ही ४८१६) रविवारी रात्री अपघात झाला. हे सर्व जण मालेगावकडे प्रवास करत होते. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. सात जण जखमी झाले आहे. या जखमींना रुग्णालयात हलवले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. सर्व मालेगाव तालुक्यातील जानेवाडी येथील राहणारे आहेत. प्रकाश गुलाबराव शिर्के (वय ६५), शिलाबाई प्रकाश शिर्के (वय ६०), वैशाली धर्मेंद्र सूर्यवंशी (वय ३६) आणि पूर्वा गणेश देशमुख (वय ८) वर्ष अशी अपघातातील मृतांची नावे आहे. मयतांमध्ये दोन महिला आणि एका चिमुरडीचा समावेश असून ते एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे.
प्रकाश शिर्के हे कुटुंबीयांसोबत कारने छत्रपती संभाजीनगरकडून मालेगावकडे जात होते. यादरम्यान, अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. चालकाला अंदाज न आल्याने कन्नड घाटामध्ये कार आणि इतर वाहनांमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यात अपघातानंतर कार थेट खोल दरीत कोसळली. यात कारमधील प्रकाश शिर्के, त्यांची पत्नी शिलाबाई शिर्के तसेच नातेवाईक वैशाली सूर्यवंशी आणि आठ वर्षांची मुलगी पूर्वा देशमुख या चौघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान चौघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळाली आहे. तर या कारमधील काही तरुण तसेच इतर काहीजण सुद्धा जखमी झाले आहेत.
या भीषण अपघातात अनुज धर्मेंद्र सुर्यवंशी (वय २०), जयेश धर्मेंद्र सुर्यवंशी (वय १७), सिद्धेष पुरुषोत्तम पवार (वय १२), कृष्णा वासुदेव शिर्के (वय ४), रूपाली गणेश देशमुख (वय ३०), पुष्पा पुरूषोत्तम पवार (वय ३५), वाहन चालक अभय पोपटराव जैन (वय ५०) हे सात प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर चाळीसगाव महामार्ग केंद्राच्या पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले. रुग्णवाहिकेला बोलवून रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमींना तातडीने चाळीसगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे . सातही जखमींवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसामुळे कन्नड घाटात दरड देखील कोसळली होती. त्यामुळे वाहने चालवताना मोठी अडचण निर्माण झाली होती. त्यातच हा अपघात झाल्याने घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी दाखल होऊन तात्काळ मदत कार्य करत जखमींना रुग्णालयात हलवले.
Read Latest Maharashtra News And Marathi News