• Wed. Mar 18th, 2026
    शीव रेल्वे उड्डाणपूल काही दिवसात बंद होणार; पूलबंदीची तारीख लवकरच जाहीर करणार, प्रशासनाची माहिती

    मुंबई: ब्रिटिशकालीन आणि शतकोत्तर आयुर्मान पूर्ण केलेला शीव रेल्वे उड्डाणपूल येत्या काही दिवसात बंद होणार आहे. धोकादायक असलेल्या या पुलावरील वाहतूक बंद करण्याकरिता वाहतूक पोलिसांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. यामुळे पूलबंदीच्या तारखेसाठी मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिका यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
    मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! मध्य रेल्वे, हार्बरवर रविवारी दुरुस्तीची कामे; काही लोकल फेऱ्या रद्द
    एमयूटीपी-२ अंतर्गत कुर्ला ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पाचवी-सहावी मार्गिका हा प्रकल्प मंजूर झाला आहे. कुर्ला ते परळ आणि परळ ते सीएसएमटी अशा दोन टप्प्यांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील कामासाठी शीव उड्डाणपुलाची पुनर्बांधणी करण्याचे नियोजन आहे. ‘शीव रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतूक थांबवून पूल बंद करण्यासाठी ऑक्टोबरमध्ये वाहतूक पोलिसांनी ना हकरत प्रमाणपत्र दिले आहे. पूल बंद करण्याच्या तारखेसाठी महापालिका आणि रेल्वे प्रशासन यांच्यात चर्चा सुरू आहे’, असे मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक रजनीशकुमार गोयल यांनी सांगितले.

    शीव उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केल्यावर सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड आणि धारावी आणि एलबीएस मार्गावर मोठी वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. दरम्यान मुंबईतून येणाऱ्या वाहनधारकांसह स्थानिकांना पूर्व-पश्चिम जोडणारा धारावीतील ६० फुटी रस्ता आणि शीव-धारावी ९० फूट रोड असे पर्याय उपलब्ध आहेत, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. पुलाचे पाडकाम सुरू केल्यानंतर नव्या पुलाच्या उभारणीसाठी साधारण ३० महिन्यांचा कालावधी लागणे अपेक्षित आहे. मध्य रेल्वे आणि महापालिका संयुक्तपणे पुलाची उभारणी करणार आहे. यासाठी अंदाजे ५०-६० कोटींचा खर्च अपेक्षित आहे, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

    सातारा लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच हक्क, शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव आग्रही

    कुर्ला ते परळदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकेच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. हार्बर मार्गावरील उन्नत कुर्ला स्थानकासाठी खांब तयार करण्यात आले आहे. विविध कारणांमुळे रखडलेल्या कुर्ला-सीएसएमटी पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा संपूर्ण खर्च निश्चित झालेला नाही. मात्र संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे ९२० कोटींहून अधिक खर्च अपेक्षित आहे. मध्य रेल्वेने शीव-माटुंगादरम्यान असलेला धारावीच्या दिशेने थेट उतरणारा आणखी एक रेल्वे उड्डाणपूल पाडण्याचे प्रस्तावित केले आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शीव रेल्वे उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अन्य पूलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

    पूल असा होता आणि असा असेल…

    – सध्या पुलाचा एक खांब २७ मीटर, एक खांब १३ मीटर आणि एक खांब १४ मीटर आहे.
    – नव्याने उभारण्यात येणाऱ्या पुलाचा एक खांब ५२ मीटरचा असणार आहे.
    – यामुळे नव्या पुलाखाली दोन मार्गिका उभारण्यासाठी पुरेशी जागा निर्माण होणार आहे.
    – पुलाच्या उंचीत काहीसा बदल करण्यात येणार असून पुलाची रुंदी (१५ मीटर) नव्या पुलातही कायम राहणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed