सर्वाधिक आत्महत्याग्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. पीकविमा कंपनीकडून नुकसानभरपाई मिळेल या आशेवर शेतकरी होते दिवाळीच्या दोन दिवस आधी जिल्ह्यातील ५९ हजार ४०४ शेतकऱ्यांना ४१ कोटी रुपये पीकविम्याचे मंजूर झाल्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. मात्र, विमाकंपनीच्यावतीने शेतकऱ्यांना मिळालेल्या नुकसानभरपाईचे आकडे समोर येताच शेतकऱ्यांतून संतप्त भावना उमटली. जिल्ह्यातील ७८ शेतकऱ्यांना १० रुपयांपेक्षा कमी नुकसानभरपाई मिळाल्याचे आढळून आले. तर, ९ हजार ७२७ शेतकऱ्यांना १ हजार रुपयांपेक्षा कमी नुकसानभरपाई मिळाली आहे.
शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) जिल्हाप्रमुख संतोष ढवळे आणि यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती किशोर इंगळे यांनी आवाज उठविला. पालकमंत्री संजय राठोड यांनी पीकविमा कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाच्या तक्रारीची दखल घेत चौकशी करण्याचे निर्देश कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान, जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे यांच्यासह पीकविमा कंपनीचे जिल्हाप्रमुख कुशवाह हे यवतमाळ जवळील यावली गावात गेले होते. यागावातील एका शेतकऱ्याला ३ रुपये नुकसानभरपाई मिळाल्याची तक्रार असल्याने त्याच्या शेताची पाहणी ते करीत होते. पीकविमा कंपनीचे अधिकारी गावात आल्याचे समजताच शिवसेनेचे किशोर इंगळे, संजय रंगे यांच्यासह शिवसैनिक व शेतकरी त्याठिकाणी गोळा झाले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीचे अधिकारी कुशवाह यांना दोन व तीन रुपये नुकसानभरपाई दिल्याबद्दल जाब विचारला. त्यावर कुशवाह काही सांगत असतानाच किशोर इंगळे यांनी त्यांना थापड मारली, तर इतर शिवसैनिकांनी त्यांना ओढाताण करीत त्याच्या चेहऱ्याला काळे फासले. शेतकरी व शिवसैनिक आक्रमक झालेले बघताच जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी कुशवाह यांची त्यांच्या तावडीतून सुटका करीत त्यांना वाहनात बसवून यवतमाळ गाठले.
Read Latest Maharashtra News And Marathi News