• Sun. Sep 13th, 2026

भुईत पाणी मुरलेच नाही! नाशिक विभागात ८ तालुक्यांतील भूजल पातळीत घट, टंचाईच्या झळा वाढणार

भुईत पाणी मुरलेच नाही! नाशिक विभागात ८ तालुक्यांतील भूजल पातळीत घट, टंचाईच्या झळा वाढणार

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने निरीक्षण विहिरींच्या पाणी पातळीच्या निरीक्षणाअंती भूजल पातळी अहवाल जाहीर केला असून, त्यानुसार नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील तब्बल आठ तालुक्यांतील भूजल पातळीत एक मीटरहून जास्त घट आल्याचे वास्तव उघड झाले आहे. परिणामी, विभागातील या तालुक्यांचा भूजल दुष्काळ निर्देशांक वाढला असून, तेथे गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.

राज्यातील मुंबई वगळता उर्वरित ३४ जिल्ह्यांतील ३५३ तालुक्यांचा भूजल दुष्काळ निर्देशांक राज्याच्या भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार राज्यातील ५४ तालुक्यांतील भूजल दुष्काळ निर्देशांकात वाढ झाली असून, २९९ तालुक्यांतील भूजल पातळी समाधानकारक दिसून आली आहे. भूजल दुष्काळ निर्देशांक सौम्य वाढीच्या प्रकारात ५४ पैकी ४५ तालुके आहेत. मध्यम गटात ७, तर गंभीर गटात दोन तालुक्यांचा समावेश आहे. सौम्य वाढीच्या प्रकारातील तालुक्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

नगर वगळता इतरत्र घट

नाशिक विभागातील नगर जिल्ह्यातील सर्व १४ तालुक्यांची भूजल पातळी समाधानकारक आढळून आली आहे. तर उर्वरित चार जिल्ह्यांतील ८ तालुक्यांची भूजल पातळी घटल्याने या तालुक्यांच्या भूजल दुष्काळ निर्देशांकाचा आलेख उंचावला आहे. त्यात चांदवड, मालेगाव, येवला, नंदुरबार, शहादा, साक्री, शिंदखेडा आणि चाळीसगाव या ८ तालुक्यांचा समावेश आहे. त्यापैकी मालेगाव, नंदुरबार आणि शहादा या तीन तालुक्यांची भूजल पातळी दीड मीटरहून जास्त घटली आहे.
राज्यात या ९ जिल्ह्यांत दुष्काळ जाहीर, बळीराजावर पुन्हा संकट; सवलती जाहीर
दुष्काळ निर्देशांक वाढलेले तालुके
जिल्हा—एकूण तालुके- भूजल दुष्काळ निर्देशांक वाढलेले तालुके- सामान्य तालुके

अहमदनगर—१४—०—१४
अकोला—७—०—७
अमरावती—१४—१—१३
औरंगाबाद—९—२—७
बीड—११—४—७
भंडारा—७—०—७
बुलढाणा—१३—३—१०
चंद्रपूर—१५—०—१५
धुळे—४—२—२
गडचिरोली—१२—०—१२
गोंदिया—८—०—८
हिंगोली—५—०—५
जळगाव—१५—१—१४
जालना—८—७—१
कोल्हापूर—१२—२—१०
लातूर—१०—१—९
नागपूर—१४—०—१४
नांदेड—१६—०—१६
नंदुरबार—६—२—४
नाशिक—१५—३—१२
उस्मानाबाद—८—४—४
परभणी—९—०—९
पुणे—१३—९—४
रायगड—१५—०—१५
रत्नागिरी—९—०—९
सांगली—१०—५—५
सातारा—११—२—९
सिंधुदुर्ग—८—०—८
सोलापूर—११—६—५
ठाणे/पालघर—१४—०—१४
वर्धा—८—०—८
वाशीम—६—०—६
यवतमाळ—१६—०—१६
एकूण—३५३—५४—२९९

दुष्काळ निर्देशांक वाढीची तीव्रता
तीव्रता प्रकार—तालुके
कमालीची वाढ—०
गंभीर वाढ—२
मध्यम वाढ—७
सौम्य वाढ—४५
एकूण—५४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed