• Sat. Sep 21st, 2024

भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत का? आमदार भास्कर जाधव मराठा आरक्षणावरुन आक्रमक

भुजबळांना दंगली घडवायच्या आहेत का? आमदार भास्कर जाधव मराठा आरक्षणावरुन आक्रमक

सातारा : ‘जालना येथील एल्गार सभेत ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मोठ्या आवेशात मराठा आरक्षणाला विरोध करून आव्हानात्मक भाषेत केलेली टीका लक्षात घेतली, तर त्यांना कोणीतरी जातीय दंगली घडविण्यासाठी उचकवत आहे काय, हे विचारण्याची वेळ आली आहे,’ असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्करराव जाधव यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

‘मंत्री असताना मंत्रिमंडळात तुम्ही (भुजबळ) मराठा आरक्षणाला विरोध करीत नाही. मात्र, बाहेर आल्यानंतर अगदी राणा भीमदेवी थाटामध्ये आरक्षणाला विरोध करून आव्हान देत आहात, याचाच अर्थ त्यांचा बोलविता धनी कोणीतरी अन्य असावा, हे नक्की. मात्र, दोन्ही समाजांनी संयम राखावा. आपली डोकी थंड ठेवून आपला हक्क शांततेत मिळवावा,’ असे जाधव म्हणाले.
OBC Reservation: आरक्षणाला धक्का लागला तर सरकारला खाली खेचण्याची ओबीसींमध्ये ताकद: प्रकाश शेंडगे
‘राणे विस्‍मृतीत गेलेले नेते’

‘नारायण राणे हे विस्मृतीत गेलेले नेते आहेत. मागील आठ ते नऊ वर्षांत त्यांची ५०० लोकांची सभा आपण कोठे झाल्याचे ऐकलेले आहे का? उद्धव ठाकरे जे बोलतील त्यावर टीका करून आपले अस्तित्व दाखवण्याचा ते सतत प्रयत्न करीत असतात. त्यांची दोन्ही मुले म्हणजे महाराष्ट्राला लागलेला एक कलंक आहे,’ असे आमदार भास्करराव जाधव म्हणाले. ‘आमदार अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयानेच विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादा घालून दिली, तरीही अध्यक्ष निर्णय घेत नाहीत. ते केंद्र आणि राज्य सरकारला अभिप्रेत काम करीत आहेत. त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाचा घटनात्मक दर्जाच घालवला आहे. देशातील घटना, संविधान, लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम भाजप करीत आहे. ते हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे,’ असेही जाधव पुढे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed