मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना येथील अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करणारे मनोज जरांगे पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर निघणार आहेत. यावेळी राज्यातील विविध ठिकाणी ते भेटी देणार आहेत. २१ नोव्हेंबर रोजी ते ठाण्यात दाखल होणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्यात जरांगे येणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व आले आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचे उपोषण सुरू असताना ठाण्यात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते. या दरम्यान, सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर घोषणाबाजी केल्याने वातावरणही तणावपूर्ण झाले होते. तसेच आंदोलकांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्या मांडून जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता. या अनुषंगाने त्यांच्या ठाणे दौऱ्याची तयारी करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सोमवारी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जरांगे ठाण्यात दाखल झाल्यानंतर कुठे भेटी देणार, हा दौरा कशा पद्धतीने असेल, याबाबत चर्चा झाल्याची माहिती भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष महेश कदम यांनी दिली.
वसई आणि बोईसर येथे जाहीर सभा?
पुढील आठवड्यात कोकणात खासकरून पालघर जिल्ह्यातील वसई आणि बोईसर येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांची जाहीर सभा घेण्याची तयारी सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. पालघर जिल्ह्यात बहुतांश भागात कुणबी समाजाची संख्या मोठी असून, त्या ज्ञातीतील समाज बांधवांना कुणबी प्रमाणपत्रे मिळतात. तथापि, या भागात पश्चिम महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा या भागातील लोक मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्यांतील नोकऱ्यांसाठी या भागात आहेत. पालघर जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघ खुले असून, अन्य चार मतदारसंघ आदिवासी प्रवर्गासाठी राखीव आहेत. पण मराठा व कुणबी समाजातील मतांची संख्या मोठी असून, जरांगे यांच्या जाहीर सभांना आवश्यक ती मदत करण्यासाठी या भागातील राजकीय पक्ष पुढे येतील असा अंदाज आहे. वसई, बोईसरनंतर जरांगे यांची ठाणे व मुंबईत सभा घेण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.