• Tue. Mar 10th, 2026
    दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या घटना; ५० जणांना इजा, जखमींमध्ये बहुतांश मुलांचा समावेश

    छत्रपती संभाजीनगर: दिवाळीच्या फटाक्यांमुळे किमान ५० जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये २३ व्यक्तींनी घाटीत, तर खासगीत २५ पेक्षा जास्त व्यक्तींनी उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले. शहर तसेच जिल्ह्यात रविवारी (१२ नोव्हेंबर) म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फटाक्यांमुळे आतापर्यंत सर्वाधिक व्यक्ती जखमी झाल्याचेही स्पष्ट झाले.
    दिवाळीत फटाक्यांची आतिषबाजी; आगीच्या १७ घटना उघडकीस, अग्निशमन दलामुळे परिस्थिती आटोक्यात
    शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) रविवारी सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत फटाक्यांमुळे भाजल्याचे एकूण १३ रुग्ण दाखल झाले. यात ५ वर्षीय बालक, ९ वर्षीय मुलगा आणि २३ वर्षीय तरुण रुग्णाला घाटीत दाखल करण्यात आले. तर इतर १० रुग्णांवर उपचार करुन सोडून देण्यात आले. त्याचवेळी शहरातील खासगी रुग्णालयांमध्येही अनेक रुग्णांनी उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले.

    या संदर्भात शहरातील बर्न्स स्पेशालिस्ट डॉ. रमाकांत बेंबडे म्हणाले, आमच्या रुग्णालयात रविवारी मध्यरात्रीपर्यंत १६ आणि सोमवारी सकाळपर्यंत ७ अशा २३ रुग्णांनी उपचार घेतले. यातील बहुतांश रुग्ण हे लहान मुले तसेच काही तरुण आहेत. यापैकी एका रुग्णावर शस्त्रक्रियाही करावी लागली. त्याशिवाय फराळाचे पदार्थ तयार करताना गरम तेल अंगावर पडून भाजलेल्या ५ ते ६ रुग्णांनीही मागच्या काही दिवसांत उपचार घेतल्याचे डॉ. बेंबडे यांनी सांगितले.

    मानाच्या गदेचं कौतुक, महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान

    याच फटाक्यांमुळे डोळ्यांना इजा झालेल्या १० पेक्षा जास्त रुग्णांवर सोमवारी (१३ नोव्हेंबर) घाटीच्या बाह्य विभागात उपचार झाले. यातील काही रुग्णांच्या बुबुळाला मार लागल्याचेही दिसून आले. हे बहुतांश रुग्ण २० ते २५ पेक्षा कमी वयाचे आहेत, असेही नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. अर्चना वरे यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *