• Sat. Sep 21st, 2024

फटाक्यांमुळे हवा प्रदूषणात भर, दिवाळीला शिवाजीनगर परिसरात हवेची गुणवत्ता अतिवाईट

फटाक्यांमुळे हवा प्रदूषणात भर, दिवाळीला शिवाजीनगर परिसरात हवेची गुणवत्ता अतिवाईट

म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरात दोन आठवड्यांपासून हवेची गुणवत्ता ढासळली असतानाच, रविवारी त्यात फटाक्यांच्या धुराची भर पडली. लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी शिवाजीनगर परिसरातील हवेची गुणवत्ता अतिवाईट, तर कोथरूड, पिंपरीमधील भूमकर चौक, निगडी, भोसरीमध्ये हवेचा दर्जा वाईट नोंदविण्यात आला. आसमंतामध्ये फटाक्यांच्या रोषणाईबरोबरच धुराचे लोटही पाहायला मिळाले. आवाजाच्या फटाक्यांच्या बरोबरीने नागरिकांनी फॅन्सी, रोषणाईचे फटाके वाजविल्याने हवा प्रदूषण वाढले.

पुण्यात वातावरणातील घडामोडींमुळे चार दिवसांपूर्वीपर्यंत हवेची गुणवत्ता ढासळली होती. आरोग्यास घातक असलेले सूक्ष्म धूलिकण (पार्टीक्यूलेट मॅटर १०) आणि अतिसूक्ष्म धूलिकणाचे (पीएम २.५) हवेतील प्रमाण धक्कादायक वाढल्याने नागरिकांना सर्दी, खोकला, अॅलर्जी, श्वसनाच्या तक्रारी जाणवत होत्या. शहरात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी तिन्ही दिवस पावसाने हजेरी लावल्याने वायू प्रदूषणात मोठी घट झाली. शनिवारी मध्यवर्ती पुण्यासह उपनगरातील हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक चांगली आणि समाधानकारक या श्रेणीत पोहोचला होता. मात्र, रविवारी दुपारपासून सुरू झालेल्या आतषबाजीमुळे हवेची गुणवत्ता पुन्हा ढासळली आहे.

आजारी पत्नीला मिठी मारताना सिसोदियांना अश्रू अनावर, फोटो पाहून केजरीवालही झाले भावुक
एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह विविध स्वयंसेवी संस्थांकडून सातत्याने सुरू असलेल्या जनजागृतीमुळे फटाके वाजविण्याचे प्रमाण घटल्याचे अधिकारी सांगत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने फटाके उडविण्याच्या वेळांवर घातलेल्या बंधनांमुळे रात्री दहानंतर फटाके वाजविणेही कमी झाले आहे. या वर्षी वसुबारस, धनत्रयोदशीला पुणेकरांनी फटाकेच वाजवले नाहीत. नरक चतुर्दशीला पहाटे पूर्वीच्या तुलनेत कमी फटाके उडवले गेले. तरीही लक्ष्मीपूजनाच्या संध्याकाळी वाजलेल्या फटाक्यांनी सर्व तूट भरून काढली. संध्याकाळी सहा वाजल्यापासून फटाक्यांचे आवाज सुरू झाले. त्यामुळे ‘भारतीय उष्ण कटिबंधीय विज्ञान संशोधन संस्थे’च्या (आयआयटीएम) ‘सफर’ विभागाने घेतलेल्या नोंदीमध्ये हवेची गुणवत्ता संध्याकाळनंतर ढासळल्याची नोंद झाली.

आवाज कमी, मात्र धूर वाढला

गेल्या काही वर्षांत दिवाळीतील फटाक्यांमुळे होणाऱ्या आ‌वाजाच्या दुष्परिणामांबद्दल जागृती झाली आहे. नागरिक अलीकडे आवाजी फटाक्यांऐवजी शोभेच्या फटाक्यांची मागणी करीत आहेत. परिणामी ध्वनिप्रदूषण कमी होऊन हवेच्या प्रदूषणात वाढ झाल्याचे चार वर्षांतील निष्कर्षांमधून स्पष्ट झाले आहे. दर वर्षी दिवाळीमध्ये थंडी असते. तापमान कमी असल्याने हवा जड होऊन ती वातावरणात स्थिर राहते. एरवी तापमान वाढले, की हवा हलकी होऊन उंच जाते, पसरते. त्यामुळे धूलिकणही विखुरतात. गेल्या आठवड्यात तापमानात सातत्याने चढ-उतार नोंदविले जात आहेत. त्यामुळे वायू प्रदूषणातही लक्षणीय बदल सुरू असून, नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम दिसतो आहे.

‘सफर’ने नोंदवलेला शहरातील हवेचा गुणवत्तेचा निर्देशांक

(रात्री साडेनऊपर्यंत)

शिवाजीनगर : ३०६ (अतिवाईट)

निगडी : २५२ (वाईट)

भूमकर चौक : २२६ (वाईट)

कोथरूड : २०८ (वाईट)

भोसरी १९७ (वाईट)

आळंदी : १३५ (मध्यम)

लोहगाव : १३० (मध्यम)

हडपसर : ११२ (मध्यम)

कात्रज : १०२ (मध्यम)

पाषाण : ९५ (समाधानकारक)

पुणे सरासरी : १७६ (मध्यम)

(हवेची गुणवत्ता समाधानकारक, उत्तम अपेक्षित असल्यास निर्देशांक १००पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)

मुलाचा मृत्यू, वडिलांनी विम्याचे ९० लाख घेतले, १७ वर्षांनी घरच्यांनीच धक्कादायक रहस्य उलगडलं
Read Latest Maharashtra News And Marathi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed