ओबीसी प्रवर्गातील एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणादरम्यान येणाऱ्या खर्चात ‘महाज्योती’मार्फत अर्थसहाय्य केले जाते. यासाठी एमपीएससी प्रशिक्षण चाळणी परीक्षा घेऊन त्यातील गुणांआधारे हे सहाय्य केले जाते. यंदा ऑक्टोबर महिन्यात झालेल्या या परीक्षेचा निकाल ‘महाज्योती’मार्फत नुकताच जाहीर करण्यात आला. २०० मार्कांसाठी घेण्यात आलेली ही परीक्षा राज्यातील १९ हजार १७३ विद्यार्थ्यांनी दिली होती. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना २०० पेक्षा अधिक मार्क मिळाले असून, हे लक्षात येताच ‘महाज्योती’ने वेबसाइटवरून ही गुणवत्ता यादी काढून घेत सुधारित निकाल जाहीर करणार असल्याची सूचना पोर्टलवर दिली आहे. यापूर्वीही ‘महाज्योती’च्या यूपीएससी व एमपीएससी प्रशिक्षण चाळणी परीक्षेमध्ये असाच गोंधळ पुढे आला होता. त्यानंतर या दोन्ही परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाच्या परीक्षेत पूर्वीची कंपनी टाळून दुसऱ्या कंपनीला परीक्षेचे कंत्राट देण्यात आले होते. तरीही हा गोंधळ पुढे आला आहे.
ही बाब लक्षात येताच ‘महाज्योती’ने गुणवत्ता यादी वेबसाइटवरून हटविली आहे. तसेच नॉर्मलायझेशन केल्यामुळे विद्यार्थ्यांचे गुण एकूण गुणापेक्षा अधिक असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षा घेणारी कंपनी तसेच तज्ज्ञांकडून नॉमलायझेशन फॉर्मुला बरोबर असल्याची खात्री करून घेऊन, पुन्हा गुणवत्ता यादी प्रसद्ध केली जाणार असल्याचे ‘महाज्योती’ने स्पष्ट केले आहे.
एखाद्या कंपनीला परीक्षेचे कंत्राट देताना त्या कंपनीची पार्श्वभूमी जाणून घेणे गरजेचे आहे. परंतु ‘महाज्योती’ने कोणतीही शहानिशा न करता परीक्षेचे कंत्राट या कंपनीला दिल्याचे दिसून येत आहे. लवकरात लवकर सुधारित निकाल प्रसिद्ध होणे गरजेचे आहे.
-महेश घरबुडे, कार्याध्यक्ष
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती
Read Latest Maharashtra News And Marathi News