• Sun. Mar 15th, 2026
    आरक्षण आधी आणि पक्ष, नेते नंतर; दिवाळीत नेत्यांना जाब विचारा, मनोज जरांगे यांचे आवाहन

    छत्रपती संभाजीनगर: दिवाळी सणात राजकीय नेते फराळाचे कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमाला जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना मराठा आरक्षणासाठी आवाज उठविण्यास सांगावे. येत्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा ताकदीने मांडण्यास त्यांना सांगावे. आरक्षण आधी आणि पक्ष, नेते नंतर आहेत, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केले.
    निराधार वयस्कर दांम्पत्याची दिवाळी फराळा विनाच; धाराशिवमधील वृद्ध जोडपं मुलांच्या आधाराच्या प्रतिक्षेत
    महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. बीड जिल्ह्यात आंदोलकांवर पोलीस प्रशासन दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात कुणबी नोंदी तपासणीची मोहीम सुरू आहे. येत्या २४ डिसेंबरपर्यंत नोंदी शोधण्याचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत राज्य सरकारने जरांगे यांना लेखी मसुदा दिलेला नाही. संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी झाली नसल्यामुळे शिष्टमंडळ जरांगे यांच्या भेटीला आले नसल्याची चर्चा आहे. आम्हाला सरकारच्या कार्यवाहीची प्रतीक्षा आहे. अन्यथा, आमची भूमिका जाहीर करू, असे जरांगे यांनी शनिवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

    येत्या एक डिसेंबरपासून प्रत्येक गावात मराठा आरक्षणासाठी साखळी उपोषण सुरू होणार आहे. या मोहिमेबाबतही जरांगे यांनी भूमिका मांडली. ‘मराठा समाजाला मोठी लढाई जिंकायची आहे. त्यामुळे कुणीही आत्महत्या करू नका. जिवंत राहूनच लढाई करायची आहे. २४ डिसेंबरनंतर होणाऱ्या आंदोलनाची तयारी करावी. कुणीही आंदोलनात उद्रेक करायचा नसून एक डिसेंबरपासून प्रत्येक गावात ताकदीने साखळी उपोषण करायचे आहे. गावागावात साखळी उपोषण सुरू राहिले पाहिजे. मुलांचे हित जोपासताना पक्ष आणि नेते यांच्याकडे दुर्लक्ष करा’, असे जरांगे म्हणाले.

    हिमनदी की इंद्रायणी? अलंकापुरीतील इंद्रायणी नदीचे पावित्र्य धोक्यात

    जुन्या संस्थानातील दप्तरात कुणबी नोंदीचे दस्तावेज मिळाल्यास गोरगरिबांचे कल्याण होईल. समिती आल्यास संस्थानांनी कागदपत्रे उपलब्ध करावी, असे जरांगे म्हणाले. दरम्यान, अंतरवाली येथील उपोषण सोडल्यानंतर मागील बारा दिवसांपासून जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना रविवार, १२ नोव्हेंबर रोजी सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार आहे. त्यापूर्वी जरांगे यांनी शनिवारी रात्री देवगाव रंगारी, कोलठाण, गोपालपूर, कुबेर गेवराई येथे भेटीगाठी घेतल्या. रविवारी सकाळी जरांगे अंतरवालीकडे रवाना होणार आहेत.

    महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी सायंकाळी मनोज जरांगे यांची रुग्णालयात भेट घेतली. ७ ते २२ डिसेंबर या कालावधीत हिवाळी अधिवेशन आहे. राज्याचा कुणबी नोंदींचा अहवाल तयार आहे. दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेऊन आरक्षणाचा ठराव पारित करावा, अशी मागणी जरांगे यांनी केली. अहवाल तयार असल्याने अडचण येणार नाही. सरकार योग्य तो निर्णय घेईल, असे विखे म्हणाले. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंतीही जरांगे यांनी केली. बीड जिल्ह्यात तीन हजार लोकांची विनाकारण चौकशी केली. अनेकांना मारहाण करण्यात आली. जिल्हा प्रशासन मोठे की राज्य सरकार मोठे ? साखळी उपोषण करणाऱ्यांवर दहशत का निर्माण करीत आहेत, असा सवाल जरांगे यांनी केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed