• Sun. Sep 22nd, 2024

राहुल गांधींनी तुम्हाला हेच शिकवलं का? भुजबळांवर बरसणारे जरांगे पाटील वडेट्टीवारांवर बरसले

राहुल गांधींनी तुम्हाला हेच शिकवलं का? भुजबळांवर बरसणारे जरांगे पाटील वडेट्टीवारांवर बरसले

जालना : विरोधी पक्षनेता हा जनतेचे-समाजाचे प्रश्न विधिमंडळात मांडत असतो. त्यांच्या सुख दु:खाविषयी बोलत असतो. त्यांच्या प्रश्नांवरती आवाज उठवत असतो आणि सरकारने न्याय द्यावा, यासाठी सरकारवर दबाव आणत असतो. पण राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना जातीचा गर्व झालाय. घटनेला असा विरोधी पक्षनेते अपेक्षित असतो का? राहुल गांधींनी हेच शिकवलंय का? मराठ्यांविरोधात आवाज उठविण्यासाठी राहुल गांधींनी पद दिलंय का? अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर केली आहे.

मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील यांचे ऐकून निर्णय घेतला तर भविष्यात त्यांचे फार मोठे नुकसान होईल, असा धोक्याचा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. त्यावर बोलताना जरांगे पाटील यांनी वडेट्टीवार यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना प्रत्युत्तर दिलं. मराठा तरुणांनी अभ्यास करुन आपल्या भविष्याचा निर्णय घ्यावा, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी दिला होता. त्यांच्या सल्ल्यावर बोलताना जरांगे पाटलांनी थेट वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदाची पात्रताच काढली.

माझ्या गोरगरिब पोरांना आरक्षण द्या, ही धमकी समजता का? मराठ्यांना आरक्षण देऊ नका असं म्हणतात, राहुल गांधींनी मराठ्यांविरोधात बोलण्यासाठी तुम्हाला पाठवले का? विरोधी पक्षनेता कुणाचा नसतो, तो जनतेचा आवाज असतो. क्षत्रीय मराठ्यांविरोधात बोलला तर तुझ्या पाठीवर थाप टाकू असं राहुल गांधींनी सांगितलंय का? असे सवाल जरांगे पाटील यांनी केले.

सरकारला वाईट बोलले तर तुम्हाला काय झालं? तुमच्या राजकारणात आम्हाला का डाग लावताय? राजकारणासाठी करत असतो तर मराठवाड्याला आरक्षण मिळत असताना समितीला राज्यभरातील मराठ्यांसाठी काम करायला लावलं नसतं. माझा मराठा समाज कानाकोपऱ्यात एक झालंय याचा मला आनंद आहे असं जरांगे पाटील म्हणाले.

वडेट्टीवार जरांगे पाटलांना काय म्हणाले होते?

राठा समाजाला ३७२ जाती असलेल्या ओबीसी प्रवर्गात येऊन फार काही फायदा मिळणार नाही. मराठा समाज ओबीसीत आला की ओपन (खुल्या) प्रवर्गात फार जाती राहणार नाहीत. म्हणजे जिथे नोकऱ्यांचा आणि सोयीसवलतींचा विषय येतो, त्या पातळीवर मराठा समाजाचे फार मोठे नुकसान होईल. अशा परिस्थितीत मराठा तरुणांनी अभ्यास करुन, थोडा विचार करुन, आपण कोणाला साथ देतोय, आपलं भलं कशात आहे, याचा विचार करावा, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed