काळ्या मातीपासून बनवलेली मडकी, पणत्या आदी वस्तू भट्टीत भाजाव्या लागतात. मात्र, पालघर जिल्ह्यातील भट्ट्या विकासाच्या रेट्यात गायब होत आहेत. आधीच भट्ट्या पेटवण्यासाठी जागा नसताना, धूरांमुळे प्रदूषण होत असल्यानेही भट्ट्या बंद कराव्या लागल्या आहेत. जिल्ह्यातील धुकटण गाव, मनोर तसेच शहरातील सिडको वसाहतीजवळ सत्र न्यायालयासमोर अशा हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच भट्ट्या आज सुरू आहेत. मात्र येथे तयार होणाऱ्या पणत्या पुरेशा नसल्याने ग्राहकांची मागणी पूर्ण करण्यासाठी गुजरातमधून पणत्यांची आयात करावी लागत आहे, असे विक्रेत्यांनी संगितले. दिवाळीत पूजेसाठी लागणाऱ्या छोट्या चुली आणि जाती या वस्तूदेखील आता मातीऐवजी पीओपीपासून तयार केल्या जाऊ लागल्या आहेत.
विकासकामांमुळे माती महाग
पालघर जिल्ह्यात बोईसर, पालघर, सफाळे, वाणगाव, डहाणू, तलासरी, विक्रमगड, वाडा, कुडूस, जव्हार, मोखाडा, वसई, नालासोपारा, नायगाव, विरार आदी सर्वच ठिकाणी औद्योगिक क्षेत्र आणि गृहनिर्माण प्रकल्प वेगाने उभे राहत आहेत. या बांधकामासाठी विटांना प्रचंड मागणी असल्याने वीट पाडण्यासाठी चारपट भावाने माती विकत घेतली जाते. त्यामुळे मातीचे दर कुंभारांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यातच भट्टीसाठी कोळसा, लाकडे उपलब्ध होत नसल्याने व्यवसायाला उतरती कळा लागली आहे.
पारंपरिक छोट्या मातीच्या पणत्या (टिवल्या) या केवळ चाकावर तयार करून भट्टीत भाजल्या जात असत. मात्र, भट्टी बंद झाल्याने टिवल्या बाजारातून गायब झाल्या आहेत. यंदा बाजारात उपलब्ध असलेल्या पणत्या या थेट गुजरातमधून आणलेल्या आहेत. या पणत्या तीन रुपये दराने खरेदी कराव्या लागतात. मात्र, पाच रुपये दराने या पणत्या विकत घेण्यास ग्राहक तयार होत नाहीत.
– धनसुख वाघेला, कुंभार, पालघर
