जीवनज्योत ट्रस्टला काळ्या यादीमध्ये टाकण्यात आल्यानंतर पालिका प्रशासनाकडून अतिदक्षता विभागाचे काम सुरू ठेवण्यासाठी प्राधान्याने पर्यायी व्यवस्था होणे गरजेचे होते. मात्र दहा खाटांच्या या रुग्णालयामध्ये या वर्षातील जुलै महिन्यापासून वैद्यकीय सेवा बंद आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये असणारे तसेच प्रकृती खालावल्यास अतिदक्षता विभागाची गरज रुग्णांना लागते. अशावेळी अंधेरी, मालाड, दहिसर, बोरिवली या भागासह सक्षम आरोग्यव्यवस्था नसलेल्या विरार- वसईमधूनही अनेक रुग्ण येथे वैद्यकीय मदतीसाठी येतात. त्यांनाही आता आपत्कालीन परिस्थितीमध्ये वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचण निर्माण होत आहे.
पालिका आणि सार्वजनिक रुग्णालयामधील अतिदक्षता विभागामध्ये खाटांची सहज उपलब्धता होत नाही. अशावेळी महत्त्वाच्या रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग तत्काळ सुरू होणे गरजेचे असल्याची मागणी आजूबाजूच्या परिसरातील रुग्णांच्या कुटुंबीयाकडून सातत्याने होत आहे.
कळवा, नांदेड प्रकरणापासून धडा घेणार का?
‘आयसीयूची उपलब्धता ही कोणत्याही रुग्णालयामध्ये अत्यंत महत्त्वाची सेवा असते. ठाण्यातील कळवा तसेच नांदेडमधील शासकीय रुग्णालयामध्ये झालेल्या रुग्णमृत्यूप्रकरणानंतर पालिका तसेच सार्वजनिक रुग्णालयांनी बोध घ्यायला हवा. पालिका व सार्वजनिक रुग्णालयांची व्यवस्था आयसीयू खाटांच्या उपलब्धतेसाठी समन्वयाने काम करत नाही. त्यामुळे उपनगरातील रुग्णांना जवळच्या रुग्णालयांचा आधार असतो’, असे आरोग्यक्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते एन. एस. पाटील यांनी सांगितले.
डेंग्यूबाधित रुग्णांचा विचार हवा
पश्चिम उपनगरामध्ये मागील काही महिन्यांपासून डेंग्यू, मलेरिया तसेच स्वाइन फ्लूच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली दिसते. टायफॉइड तसेच डेंग्यू रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारादरम्यान आयसीयूमध्ये सहा ते सात दिवसांपेक्षा अधिक काळ राहावे लागत आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णांपैकी ज्या रुग्णांमध्ये प्लेटलेटची संख्या वीस हजारापेक्षा कमी असेल किंवा रक्तस्त्राव होत असेल तर त्या रुग्णांवर आयसीयूमध्येच उपचार केले जातात.
हा आहे पर्याय
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, सध्या बंद असलेल्या सिद्धार्थ रुग्णालयातील डॉक्टर, डीएनबी शिक्षक, बंधपात्रित डॉक्टरांच्या मदतीने हा विभाग पुन्हा सुरू करता येईल, असे भगवती रुग्णालयातील वरिष्ठ तज्ज्ञांनी म्हटले आहे. जिल्हा निवासी कार्यक्रमातंर्गत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये जे निवासी डॉक्टर पुन्हा या पदांवर रुजू झाले आहेत, त्यांनाही यात जोडून घेता येईल. मात्र या पर्यायाचा विचार अद्याप झालेला नाही. मुलुंड येथील एमटी अगरवाल रुग्णालयामध्ये जीवनज्योत ट्रस्टने केलेल्या गैरप्रकारांची चौकशी व्हावी , अशी मागणी करण्यात येत आहे. एमटी अगरवाल आणि भगवती रुग्णालयांप्रमाणे इतर रुग्णालयांमध्येही असा गैरप्रकार झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
काय होते प्रकरण?
मुलुंडमधील एमटी अगरवाल रुग्णालयामध्ये जीवनज्योत ट्रस्टने अतिदक्षता विभागामध्ये डॉक्टरांची सेवा पुरवली नाही. खोटी हजेरी लावणे तसेच योग्य शैक्षणिक अहर्ता तसेच अनुभव नसलेल्या डॉक्टरांची खोटी उपस्थिती लावणे, खोटी नोंदणी व पदवीप्रमाणपत्र सादर करण्यास बनावट ओळखपत्र देण्याचे गैरप्रकार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News