नंदीग्राम एक्स्प्रेस ही गुरुवारी रात्री जालना रेल्वेस्थानकावर थांबली होती. त्यावेळी रेल्वे कर्मचारी स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यासाठी गेले असता स्वच्छ्तागृहात कुणी तरी अज्ञात मातेने एक स्त्री जातीचे अर्भक सोडून दिल्याचे कर्मचाऱ्यांना दिसून आले. अगोदर त्यांनी डब्यात विचारपूस केली. पण, काही माहिती न मिळाल्याने कुणी तरी मातेने हे अर्भक टाकून दिल्याची खात्री पटली.
ही माहिती मिळताच रेल्वे विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष दाभाडे यांनी त्या बालिकेला स्त्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. बालकल्याण समितीचे अध्यक्ष एकनाथ राऊत, योगीता माटे, बालाजी लाड यांनी संबंधित बालिकेला उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. तसेच, छत्रपती संभाजीनगर येथील शिशूगृहात संपर्क साधल्यानंतर एक केअरटेकर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गेल्या वर्षभरात असे ८ अर्भक आढळले असून त्यांच्यावर उपचार करून छत्रपती संभाजीनगर येथील शिशूगृहात दाखल करण्यात आले आहे. अर्भक फेकून देणे हा कायद्याने गुन्हा आहे. ते अर्भक बालकल्याण समितीकडे सुपूर्द केल्यानंतर त्याची जबाबदारी समितीने घेतली. यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. अर्भक आढळले तर बालकल्याण समितीशी संपर्क साधण्याचे आवाहन बालकल्याण समिती जालनाचे अध्यक्ष एकनाथ राऊत यांनी केले आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News