• Sun. Mar 8th, 2026
    मनोज जरांगेंचा निर्वाणीचा इशारा, राज्य सरकारला संध्याकाळपर्यंतची मुदत, अन्यथा…

    म. टा. प्रतिनिधी, जालना: ‘आरक्षण कधी देणार ते सांगा, विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने बुधवारी सायंकाळपर्यंत याविषयी काही कळवले नाही, तर मी बुधवारी सायंकाळपासून पाणीत्याग करेन,’ असा इशारा मनोज जरांगे यांनी मंगळवारी सायंकाळी दिला. ते पत्रकारांशी बोलत होते.

    राज्य मंत्रिमंडळ बैठक, कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत झालेले निर्णय, सोमवारी बीडमध्ये झालेल्या हिंसक घटनांनंतर पोलिस कारवाईबाबत दिलेला इशारा यांसह आरक्षणाबाबत सरकार; विशेषत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जरांगे यांनी टीका केली. ‘हिंसक घटनांच्या मागे सत्ताधाऱ्यांचाच हात आहे. बीडमध्ये निष्पाप मराठा तरुणांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. हे थांबवले पाहिजे. चुकीचे गुन्हे दाखल केले, तर मी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येऊन बसतो. आधी आमचे आंदोलन नंतर तुमची संचारबंदी. मी बीडला आलो, तर तुम्हाला कळेल,’ असे ते म्हणाले.

    उद्धव ठाकरेंच्या चुकांमुळे मराठा आरक्षण गमावलं, त्यांनी राज्याची माफी मागावी: चंद्रशेखर बावनकुळे
    राज्य सरकार बीडमधील प्रकरणात खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करत आहे. बीड व जालना येथील इंटरनेट सेवा बंद केली आहे, यावरही जरांगे यांची टीका केली. ‘या सरकारला दुसरे काय येते. सरकारमधील एक उपमुख्यमंत्री खोडील आहेत. अनेक वर्षांपासून ते समाजा-समाजात भांडण लावत आहेत. हे आता चालणार नाही,’ असे ते म्हणाले. त्यांच्यामुळे राज्यात भाजप मागे जात आहे. त्याला तेच जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला. आमच्या अंगावर कुणी आले तर आम्ही सोडणार नाही. सरकारने मराठा आरक्षणाबाबत आत्तापर्यंत घेतलेला एकही निर्णय मान्य नाही. अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली. आरक्षणप्रश्नी कुणीही आमदार, खासदारकीचे राजीनामे देऊ नयेत, त्यांनी मुंबईत बसून सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन जरांगे यांनी केले.

    शाहू महाराज छत्रपतींनी घेतली भेट

    कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती यांनी मंगळवारी दुपारी जरांगे यांची भेट घेतली आणि आरक्षणप्रश्नी चर्चा केली. जरांगे यांनी महाराजांच्या हातून पाणी प्यायले. ‘आरक्षण आंदोलनात मी तुमच्यासोबत आहे. पाणी पिऊन आंदोलन करा, प्रकृतीला जपा,’ असे आवाहन शाहू महाराज यांनी केले.

    १८८१ मध्ये राज्यात ३१ लाख मराठा कुणबी, ब्रिटिशांनी केलेली जातनिहाय जनगणना, विश्वास पाटील यांचे संशोधन
    मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी सकाळी जरांगे यांच्याशी मोबाइलवरून संवाद साधला. दोघांमध्ये २० मिनिटे चर्चा झाली. ‘अर्धवट आरक्षण स्वीकारणार नाही, सरसकट ओबीसीत समाविष्ट करून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील,’ असे जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मराठवाड्याव्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्रातील मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र न देणे चालणार नाही. विधानसभेचे विशेष अधिवेशन तत्काळ घेऊन न्यायमूर्ती शिंदे समितीस राज्याचा दर्जा देऊन त्यांचा अहवाल स्वीकारून सर्व महाराष्ट्रातील मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करा, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असे जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

    जरांगे पाटलांची स्क्रीप्ट कोण लिहून देत आहे? जरांगेंची फडणवीसांवर टीका, नितेश राणेंचा पलटवार

    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed