दरम्यान, राज्यात सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या प्रकरणावरही कन्हैय्या यांनी भाष्य केले. ड्रग्जचे अतिप्रचंड साठे अदानी यांच्या ताब्यात असलेल्या मुंद्रा बंदरातच कसे मिळतात, यावर केंद्रीय गृहमंत्रालय काहीच बोलत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
फडणवीस यांचा ‘अडवाणी’ केला…
राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना कन्हैया कुमार यांनी देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावला. आजकाल त्यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नीच्या गाण्याचे व्हिडीओ जास्त बघितले जातात, असे सांगत आपल्याला फडणवीस यांची दया येत असल्याचे कन्हैया म्हणाले. केंद्रातील त्यांच्या मदाऱ्यांनी त्यांचा पार ‘अडवाणी’ केला आहे. १०५ आमदार असूनही दुसऱ्या पक्षातल्या माणसाला मुख्यमंत्रिपदी बसवून त्याच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना काम करावे लागत आहे, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ‘शासन आपल्या दारी’साठी यवतमाळमध्ये
सर्वसामान्य नागरिकांना कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम आज, सोमवारी यवतमाळजवळील किन्ही येथे आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड राहतील. कार्यक्रमादरम्यान लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभाचे वितरण केले जाणार आहे. कार्यक्रमस्थळी रोजगार मेळाव्यासह विविध विभागांचे स्टॅाल राहणार आहेत. यासोबतच सकाळी साडेदहा वाजता सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे कीर्तन होईल. मुख्य कार्यक्रमासह नागरिकांनी कीर्तनाचादेखील लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी केले आहे.