सकल मराठा समाजाने रविकांत तुपकर यांची लातूरच्या औसा रस्त्यावर असणाऱ्या विश्रामगृहातील बैठक उधळून लावली. त्यांना मराठा आरक्षणाच काय झालं म्हणून जाब विचारला. राजकीय पुढाऱ्यांना बंदी केली असताना तुम्ही लातूरमध्ये आलाच कसे, आंदोलकांनी तुपकर यांना विचारले. यावेळी रविकांत तुपकर विश्रामगृहातील एका सोफ्यावर बसले होते. मराठा आंदोलकांनी त्यांना घेरत जोरदार घोषणाबाजी सुरु केली. ‘रविकांत तुपकर चले जाव’, ‘रविकांत तुपकर परत जा, परत जा’ अशा घोषणा आंदोलक देत होते. रविकांत तुपकर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलक तुपकर यांच्यासमोर जोरजोरात घोषणा देत राहिले. अखेर रविकांत तुपकर यांनी सोफ्यावरुन उठत बैठक रद्द केली आणि ते माघारी फिरले.
मराठा आंदोलकांनी शंभूराज देसाईंना पुरतं घेरलं, प्रश्नांची सरबत्ती
मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनलेला असताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शनिवारी साताऱ्यात मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. प्रश्नांची सरबत्ती करत मराठा आंदोलकांनी शंभूराज देसाईंना घेराव घातला. आजपर्यंत सरकारने फक्त आश्वासनांचा पाऊस पडला पण काम एक रुपयाचं केलेलं नाही, आरक्षण कधी देणार? एवढंच सांगा, असा सवाल करत मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली.