अजित पवार राष्ट्रवादीचा एक मोठा गट घेऊन भाजप-शिवसेना सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचं कार्यकर्त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं. परंतु पुण्याच्या पालकमंत्रिपदावर अजित पवारांना समाधान मानावं लागलं. अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्याने चंद्रकांत पाटलांना मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या सत्ताकाळात कारभारी झालेल्या चंद्रकांत पाटलांना हटवून अजित पवारांना पालकमंत्री केल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड रोष आहे. मात्र चंद्रकांत पाटलांनी पालकमंत्री पद गेल्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.
पालकमंत्री पद सोडणे, ही एका कामासाठी केलेली छोटीशी तडजोड
भाजपमधूनच चंद्रकांत पाटलांचे पंख छाटले जातं असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता यावर चंद्रकांत पाटील यांनी स्वतः प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडून पुण्याचे पालकमंत्रीपद गेल्याने अनेकजण नाराजी व्यक्त करत आहेत. कोणीही नाराज व्हायचे कारण नाही. पालकमंत्री पद सोडणे, ही एका कामासाठी केलेली छोटीशी तडजोड आहे. माझं शासकीय विश्रमगृहातील कार्यालय सुरू राहणार आहे. आपली कामे देखील सुरू राहणार आहेत. नाराज न होता लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागा, असं बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीत चंद्रकांत पाटील म्हणाले.
बारामती जिंकायचीच… आत्ता नाही तर कधीच नाही!
पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, बारामती लोकसभा जिंकण्याची आता संधी आहे. यावेळी जिंकलो नाही तर पुन्हा कधीच जिंकणार नाही. त्यामुळे मतभेद, वाद बाजूला ठेवून कामाला लागा, अशा सूचनाही चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत.
अमेठीनंतर बारामती महत्त्वाची
दुसरीकडे, याच बैठकीत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला बारामती जिंकायची आहे. अमेठी नंतर बारामती सगळ्यात मोठी प्रतिष्ठा आहे. मला बारामती जिंकायची आहे. यात सगळ्यात मोठं श्रेय तुमचं असेल, त्यासाठी तुम्ही कामाला लागा, असं म्हणाले. जे कार्यकर्ते ‘मन की बात’ ऐकण्यासाठी येणार नाहीत त्यांना पदावरून हटवणार, असा थेट इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. भोरमध्ये अवघे १५ कार्यकर्ते ‘मन की बात’ ऐकण्यासाठी होते. ‘मन की बात’ ऐकण्यासाठी आलंच पाहिजे आणि त्याचे फोटो अपलोड झालेच पाहिजे. डिसेंबर महिना हा शेवटचा अल्टिमेटम असल्याचं देखील बावनकुळे म्हणाले.