• Wed. Mar 11th, 2026
    राज्यात सरासरीहून नऊ टक्के कमी पाऊस, सर्वाधिक तुटीचे जिल्हे? जाणून घ्या…

    मुंबई : पावसाळा संपण्यास केवळ १५ दिवस शिल्लक असून राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा नऊ टक्के पाऊस कमी पडला आहे. राज्यातील एकूण पाऊस समाधानकारक असला तरी पावसाचे वितरण मात्र असमान आहे. राज्यात मध्य महाराष्ट्रात २१ टक्के, तर मराठवाड्यात २० टक्के पावसाची तूट आहे. मात्र, गुरुवारी प्रसृत करण्यात आलेल्या पुढील चार आठवड्यांच्या पूर्वानुमानुसार १५ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत मध्य भारतामध्ये सरासरीहून अधिक पावसाची शक्यता आहे.

    कोकण विभागात मुंबई शहर आणि रत्नागिरी जिल्हा वगळता इतर ठिकाणी समाधानकारक पाऊस आहे. त्यामुळे कोकण विभागात पावसाची एकूण तूट नाही. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये सात टक्के, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार टक्के तूट आहे. मध्य महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात नांदेड जिल्हा वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीहून पाऊस कमी आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये पावसाळा संपायला जेमतेम १५ दिवस शिल्लक असले तरी काही जिल्ह्यांमध्ये ४० टक्क्यांहून अधिक तूटही नोंदली गेली आहे. अहमदनगर, सांगली, सातारा, बीड आणि जालना येथे सरासरीहून ४० टक्के किंवा अधिक पावसाची तूट आहे. मध्य महाराष्ट्रात धुळे, जळगाव, कोल्हापूर, नंदुरबार, नाशिक, पुणे हे जिल्हे सध्या सरासरीच्या श्रेणीमध्ये असले तरी पावसाची या जिल्ह्यांमध्ये तूट आहे. मराठवाड्यातही केवळ नांदेड जिल्ह्यात सरासरीहून २२ टक्के अधिक पाऊस आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे. विदर्भामध्ये अकोला, अमरावती आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे, तर यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस सरासरीहून अधिक आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये पाऊस सरासरीइतकाच आहे.

    भारताच्या पराभवाचा काय ठरला टर्निंग पॉंइंट, सामना नेमका कुठून हातातून निसटला जाणून घ्या…
    गुरुवारी भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार १५ ते २१ सप्टेंबरदरम्यान कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा काही भाग येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. २२ ते २८ सप्टेंबरदरम्यान उतर कोकणाचा काही भाग, विदर्भाचा काही भाग आणि मराठवाड्याचा काही भाग येथे सरासरीहून अधिक पाऊस पडू शकतो. २९ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबरदरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हा पाऊस राज्याच्या ज्या जिल्ह्यांमध्ये ३० ते ४० टक्क्यांहून अधिक तूट जिथे आहे तिथे सरासरी भरून काढायला मदत करतो का याकडे स्थानिकांचे लक्ष आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातही मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

    १ जून ते १५ सप्टेंबरपर्यंत स्थिती (सरासरीपेक्षा प्रत्यक्ष पावसातील फरक)

    कोकण आणि गोवा – ६ टक्के

    मध्य महाराष्ट्र – उणे २१ टक्के

    मराठवाडा – उणे २० टक्के

    विदर्भ – उणे ८ टक्के

    राज्यातील सर्वाधिक तुटीचे जिल्हे

    अहमदनगर – ४० टक्के

    सांगली – ४३ टक्के

    सातारा – ४० टक्के

    बीड – ४१ टक्के

    जालना – ४२ टक्के

    हिंगोली – ३५ टक्के

    अमरावती- ३६ टक्के

    मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा

    पालघर आणि ठाणे जिल्ह्याला आज, शनिवार आणि उद्या, रविवारसाठी ऑरेंज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे, तर मुंबईसाठी यलो अॅलर्ट कायम आहे. रायगड जिल्ह्यामध्येही शनिवारी आणि रविवारी दोन्ही दिवस ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात शनिवारी घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर रविवारी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. जळगाव जिल्ह्यात शनिवारी, तर नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात शनिवारी आणि रविवारी ऑरेंज अॅलर्ट आहे. सातारा जिल्ह्यातही घाट परिसरात रविवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात अकोला आणि वाशिम जिल्ह्यात शनिवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.

    आशिया कपच्या फायनलपूर्वीच भारताला मोठा धक्का, बांगलादेशच्या विजयात गिलचे शतक वाया…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed