१९ जुलै रोजी गेवराईजवळ ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. नवीन ९०० मिलीमीटर व्यासाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असताना जेसीबी मशीनचा धक्का लागला आणि ही जलवाहिनी फुटली. त्यानंतर २२ जुलै रोजी रेल्वेस्टेशनच्या जवळ ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. याच दिवशी जायकवाडी येथील पंपहाऊसमधील फिडर क्रमांक ४ मध्ये धामण जाऊन बसल्यामुळे शॉर्टसर्किट झाले आणि संपूर्ण यंत्रणा काही तासांसाठी बंद पडली. चार ऑगस्ट रोजी जायकवाडी पंपहाउस येथील वीज उपकेंद्रातील ट्रांसफार्मरमध्ये बिघाड झाला, त्याच्या दुरुस्तीसाठी तीन दिवस लागले. त्यामुळे तीन दिवस ७०० आणि १२०० मिलीमीटर व्यासाची पाणी पुरवठा योजना बंद होती.
जलजीवन मिशनचे कामदेखील केले जात आहे. हे काम केले जात असताना जायकवाडी वसाहतीजवळ ७०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी २८ ऑगस्ट रोजी फुटली, त्याच्या दुरुस्तीसाठी आठ ते दहा तास लागले. त्यामुळे सातशे मिलीमीटर व्यासाची योजना बंद ठेवण्यात आली. चार सप्टेंबर रोजी नवीन पाणी पुरवठा योजनेची २५०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकताना गेवराई तांडा येथे १२०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. त्यानंतर १३ सप्टेंबर रोजी ९०० मिलीमीटर व्यासाच्या पाणी पुरवठा योजनेचे काम सुरु असताना जेसीबी मशीनच्या धक्क्याने १२०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. याचवेळी जायकवाडी पंपहाऊसच्या परिसरातील वीज उपकेंद्रात स्पार्किंग होऊन संपूर्ण यंत्रणा देखील बंद पडली. रात्री साडेदहाला उपकेंद्रातील दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले.
पाणी पुरवठ्याच्या यंत्रणेत वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नवीन योजनेचे काम करताना जुन्या योजनेला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली गेली पाहिजे, पंपहाउसच्या देखभाल दुरुस्तीचे काम ठरावीक दिवसानंतर केले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
