पालकमंत्री पाटील यांनी निश्चित केल्याप्रमाणे नियोजित बैठकांना बुधवारी सुरूवात झाली होती. यावेळी पाटील यांना फोन आल्यानंतर ते अचानक मुंबईला रवाना झाले. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत ते जालन्याला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यानुसार ते मुंबईला रवाना झाले आणि त्यांनी आयोजित केलेल्या बैठका आमदार आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना घेण्याच्या सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे या दोन मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक, पालिकेच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
महापालिकेचा कारभार सध्या प्रशासकांच्या माध्यमातून हाकण्यात येतो. माजी नगरसेवकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी पालकमंत्र्यांनी या आढावा बैठकीचे आयोजन केले होते. पाणीपुरवठा, ड्रेनेज तसेच साफसफाईच्या कामाबाबत प्रामुख्याने तक्रारी होत्या. यावेळी आमदारांच्या उपस्थितीत या तक्रारींवर चर्चा झडली. यावेळी एका माजी नगरसेवकांनी एका विभाग प्रमुखांना खडे बोल सुनावल्याने काही काळ बैठकीत तणावाचे वातावरण पसरले होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील या दोन्हीही नेत्यांकडून सातत्याने बैठकांचा सपाटा लावण्यात आला आहे. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्य सचिवांकडूनही प्रशासकीय बाबींसह प्रकल्पांचा आढावा घेतला जातो. काही प्रमुख प्रकल्पांविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बैठका घेतात. पुण्यातील प्रशासनाकडून सध्या या सर्व प्रमुख नेत्यांना न दुखावता त्यांच्या आयोजित केलेल्या बैठकांना उपस्थित राहण्याचे दिव्य पार पडत असल्याची चर्चा आहे.