या प्रकरणातील तक्रारदार नित्यानंद तिवारी (५९) हे उत्तरप्रदेशमधील वाराणसी येथील रहिवासी असून त्यांची नाशिक येथे डिप वाईनरी आहे. काही दिवसांपूर्वी तिवारी यांच्या ओळखीतील संदीप चव्हाण याने तिवारी यांना संपर्क साधून एक व्यक्ती दोन हजार रुपयांच्या चलनी नोटांच्या स्वरूपात १० लाख रुपये देत असल्याचे व त्याबदल्यात त्याला केवळ आठ लाख रुपयांच्या पाचशे रुपयांच्या नोटा द्याव्या लागणार असल्याचे सांगितले होते.
या व्यवहारात दोन लाख रुपयांचा फायदा होत असल्याने तिवारी यांनी या व्यवहारासाठी होकार दर्शवून त्यासाठी ते ४ सप्टेंबर रोजी वाराणसी येथून विमानाने मुंबईत आले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता संदीप चव्हाण हा काशीनाथ वंजारी सोबत तिवारी यांच्याकडे गेल्यानंतर तिवारी यांनी त्यांच्या सोबत कंळबोली येथील बँकेतून आठ लाख रुपये काढले. नोटा बदलून देणाऱ्या टोळीने त्या सर्वांना रोख रक्कम घेऊन पनवेलमधील ओरीयन मॉलजवळ येण्यास सांगितल्याने तिवारी हे संदीप यांच्या गाडीने ओरीयन मॉलजवळ गेले.
यावेळी मॉलच्या बाहेर रस्त्यावर हजर असलेल्या एका महिलेने व तिच्या सोबत असलेल्या दोन व्यक्तीनी तिवारी यांच्याकडे आठ लाख रुपये असल्याची खात्री केल्यानंतर त्यांना पंजाब नॅशनल बँकेजवळ येण्यास सांगितले. त्यानुसार तिवारी, संदीप चव्हाण, भगौती प्रसाद व या महिलेसोबत आलेला अनोळखी व्यक्ती सोबत गाडीने पंजाब नॅशनल बँकेजवळ जात असताना पनवेलमधील अमरधाम स्मशानभूमीसमोरील रोडवर त्यांच्या पाठीमागून आलेल्या गाडीने त्यांची गाडी अडवली.
या गाडीमधून उतरलेल्या दोघा लुटारूंपैकी एकाने शिव्या देत संदीप याला गाडीमधून ओढून बाहेर काढले. त्यानंतर तो स्वतः ड्रायव्हर सीटवर बसला. तर, दुसऱ्या लुटारूने तिवारी यांच्याकडे आठ लाख रुपयांची रोख रक्कम असलेली ब्रिफकेस घेऊन त्यांना गाडीमधून बाहेर काढले. त्यानंतर हा लुटारू गाडीमध्ये जाऊन बसल्यानंतर ते सर्वजण गाडी घेऊन गार्डन हॉटेलच्या दिशेने पळून गेले. त्यानंतर तिवारी यांनी पनवेल शहर पोलिस ठाणे गाठून तक्रार केली.