• Fri. Mar 20th, 2026
    मराठा आंदोलनात दगडफेक नक्की कोणी केली? क्रांती मोर्च्याच्या समन्वयकांचा धक्कादायक आरोप

    जालना : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांनी केलेला लाठीमार आणि नंतर झालेल्या गोंधळाचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याने राज्य सरकारविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. मात्र आंदोलकांनी आधी पोलिसांवर दगडफेक केल्याने लाठीमार करावा लागल्याचं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र आता मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांनी या हिंसाचारावरून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संभाजी भिडे यांच्या संघटनेवर गंभीर आरोप केले आहेत.

    मराठा आंदोलनात उद्रेक करणारे हे संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आहेत, असा गंभीर आरोप जालन्यात मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी केला आहे. जालन्यात आज मराठा समन्वयकांची एक बैठक झाली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला.

    जखमींची शासनाच्या वतीने माफी मागतो, आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मागितली माफी!

    देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

    ‘आजपर्यंत मराठा समाजानं शांततेत मोर्चे काढले. कधीच धुडगूस घातला नाही. मात्र मराठा समाजाला बदनाम करण्यासाठी संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते आंदोलनात घुसले आणि त्यांनी उद्रेक केला,’ असा आरोप समन्वयक संजय लाखे पाटील यांनी केला. त्याचबरोबर लाठीचार्ज करण्याचे आदेश कुणी दिले, याची चौकशी झाली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही यावेळी लाखे पाटील यांच्याकडून करण्यात आली.

    दरम्यान, ‘मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं. मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेतले पाहिजे आणि गुन्हे मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांच्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक उपोषणाला बसतील,’ असा इशाराही मराठा समन्वयक संजय लाखे पाटील यांनी दिला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed