• Sat. Sep 21st, 2024
मोठ्या साहेबांच्या निष्ठावंतांची पलटी; लहान साहेबांच्या चरणी लीन, मिळाली मोठी जबाबदारी

चंद्रपूर: राज्यातील फोडाफोडीच्या राजकारणाची झळ थेट चंद्रपूरला येऊन ठेपली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर आम्ही मोठ्या साहेबांसोबतच राहू, असा दावा करणारे चंद्रपूरचे निष्ठावंतांनी पलटी मारली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष राजीव कक्कड आणि कार्याध्यक्ष नितीन भटारकर या दोघांनी नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात प्रवेश घेतला. या दोघांनाही जिल्ह्यातील पदाधिकारी आपल्यासोबत असल्याचा दावा केला.
शासन आपल्या दारीमध्ये पहिल्यांदा असं घडलं,बुलढाण्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी, कारण समोर …
दुसरीकडे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी या दोघांचाही प्रवेश फुसका बार ठरला, अशी टिका केली. मोठ्या साहेबांचे शिलेदार लहान साहेबांच्या चरणी लीन झाले असले तरी मोठ्या साहेबांचे सुभेदार खंबीरपणे साहेबांच्या बाजूने उभे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून कक्कड आणि भटारकर हे दोघे पदाधिकारी होते. मात्र जिल्ह्यातील पक्षाची आजवरची स्थिती बघता त्यात फारसा बदल झाला नसल्याचेच दिसते. पक्षस्थापेनापासूनची तर आजतागायत पक्षाची चंद्रपूर जिल्ह्यातील स्थिती जैसे थे आहे. जे काही जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक निवडून आले ते स्वबळावर जिंकले.

या काळात पदाधिकारी आले आणि गेले. परंतु पक्ष वाढीसाठी कोणताही फायदा झाला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनीही चंद्रपूर जिल्ह्याला फारसे कधीच गांर्भार्याने घेतले नाही. या काळात राष्ट्रवादीचे अनेक ज्येष्ठे नेते जिल्ह्यात येऊन गेले. त्यांच्या समोर पक्षातील अंतर्गत वादाशिवाय दुसरे काहीच बघायला मिळाले नाही. दरम्यान राष्ट्रवादी कॅाग्रेसमध्ये उभी फुट पडली. अजित पवार सत्तेत सामील झाले. त्यावेळी उपरोक्त दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपण शरद पवार यांच्या सोबतच आहे. त्यांना सोडून जाण्याचा विचार सुद्दा करणार नाही, असे जाहीर केले. परंतु दीड महिन्याच्या आतच कार्यकर्त्यांची कामे होत नाही, असे त्यांच्या लक्षात आले.

बाळा नांदगावकर जालन्यात, मराठा क्रांती मोर्चाचे उपोषणकर्ते मनोज जरांगेंची राज ठाकरेंकडून फोनवरुन विचारपूस!

जिल्ह्याच्या ‘विकासा’ला हातभार लावण्यासाठी त्यांनी धाकट्या पवारांचे घड्याळ हाताला बांधल्याचे सांगितले जात आहे. अजित पवार गटात प्रवेश घेताच कक्कड यांची चंद्रपूर जिल्ह्याच्या शहर अध्यक्षपदी आणि भटारकर यांची चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या दोघांनीही मोठ्या संख्येत पदाधिकारी आपल्या सोबत आल्याचा दावा केला आहे. मात्र शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांना या दोघांच्या जाण्यामुळे फार काही फरक पडला असे वाटतं नाही. उलट नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल. त्यामुळे पक्ष वाढेल, असा दावा त्यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed