‘पावसाळा सुरू झाला की सप्टेंबरपर्यंत मान्सूनच्या वाऱ्यामुळे समुद्रातील कचरा किनाऱ्यावर ढकलला जातो. त्यामुळे हे डांबर गोळे सातत्याने जुहू किनाऱ्यावर दिसतात’, असे स्थानिक रहिवासी सुनील कनोजिया यांनी सांगितले. हे गोळे समुद्रातील नैसर्गिक तेलस्रोतापासून येत असतील किंवा जहाज धुणे, तेलवाहतूक करणाऱ्या जहाजामध्ये गळती होणे यामुळेही होत असेल. मात्र परदेशात ज्याप्रमाणे प्रयोगशाळेमध्ये या गोळ्यांचे विश्लेषण होते त्याप्रमाणे आपल्याकडे होत नाही, यामुळे याचा स्रोत कळत नाही, असे ते म्हणाले.
समुद्र प्रदूषणाच्या घटना आपल्याकडे अधिक गांभीर्याने घेतल्या गेल्या तर हे प्रदूषण थांबवण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करता येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. डांबर गोळ्यांच्या विश्लेषणासंदर्भात लवकरच अधिक माहिती देण्यात येईल, असे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले आहे.
‘जमा करून विक्री’
डांबर गोळे समुद्रात प्रदूषण होते त्यावेळी निर्माण होतात. ही केवळ पावसाळ्यापुरते जाणावणारी समस्या नाही. पावसाळ्यात समुद्राच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात घुसळण होते. या घुसळण प्रक्रियेमधून हे गोळे निर्माण होऊ शकतात. इतर वेळीही समुद्र त्याच्या पोटातील घाण किनाऱ्यावर फेकून देत असल्याने हे गोळे किनाऱ्यावर दिसू शकतात. या संदर्भात आंतरराष्ट्रीय अभ्यासही झाले आहेत. मात्र भारतात हा पदार्थ विषारी आहे याची माहिती नसल्याने भारतात समुद्रकिनाऱ्यांवर आलेले डांबर गोळे जमा करून विकण्याचेही प्रकार होतात, असे क्लायमेट रिअॅलिटी प्रकल्पाच्या राष्ट्रीय समन्वयक प्रा. डॉ. नंदिनी देशमुख यांनी स्पष्ट केले.