या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सातपूर परिसरातील कार्बन नाका येथे या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. दारु पार्टी सुरू असताना मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून शमशेर शेख आणि दिपक सोनवणे या दोघांनी मिळून शनिवारी रात्रीच्या सुमारास विश्वनाथ याच्यावर सपासप वार करत या तरुणाला संपवले. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर अपघाताचा बनाव रचण्यासाठी या दोन्ही तरुणांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयातील पोलीस चौकीवर ड्युटीवर असलेल्या पोलिसांना संशय आल्याने त्यांना ताब्यात घेतले.
यावेळी दोघांची विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि चौकीवर असलेले पोलीस हवालदार पी. एस. जगताप आणि पोलीस कॉन्स्टेबल शरद पवार यांनी दोघांना ताब्यात घेऊन गंगापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. दोन दिवसांपूर्वीच नाशिकच्या सिडको परिसरात भर चौकात तरूणाची धारदार शस्त्र आणि सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याच परिसरात काही टवाळखोरांकडून वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहनांची तोडफोड , सोनसाखळी चोरी , हत्या यासारखे गंभीर गुन्ह्यांचे प्रकार घडत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील नागरिक गुन्हेगारांच्या दहशतीखाली वावरत असून पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.