• Fri. Mar 13th, 2026

    Nagpur CNG Shortage: महाराष्ट्राच्या उपराजधानीलाही युद्धाचा फटका; नागपुरात सीएनजीसाठी कॅबचालकांना दोन तासांचे वेटिंग

    Nagpur CNG Shortage: महाराष्ट्राच्या उपराजधानीलाही युद्धाचा फटका; नागपुरात सीएनजीसाठी कॅबचालकांना दोन तासांचे वेटिंग

    Nagpur News: आर्थिकदृष्ट्या परवडत नसतानाही रांगेत उभे राहून धंदा बुडू नये या काळजीपोटी कॅबचालक पेट्रोलला पसंती देत आहेत.

    महाराष्ट्राच्या उपराजधानीलाही युद्धाचा फटका; नागपुरात सीएनजीसाठी कॅबचालकांना दोन तासांचे वेटिंग(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: पश्‍चिम आशियातील युद्धाचा वणवा आता नागपूरच्या रस्त्यांवर धगधगू लागला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे शहरात सीएनजीचा पुरवठा विस्कळीत झाल्याची ओरड सुरू झाली असून, गॅस भरण्यासाठी पंपांवर कॅबच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. कमी दाबाने होणाऱ्या पुरवठ्यामुळे चालकांना तब्बल दोन-दोन तास ताटकळत उभे राहावे लागत असून, अनेकांनी नाईलाजास्तव महागड्या पेट्रोलचा पर्याय निवडला आहे.

    कमी दाबाने गॅस मिळत असल्याने एका गाडीत इंधन भरण्यासाठी मोठा वेळ जात आहे. यामुळे दिवसाच्या ट्रिप्स कमी होऊन टॅक्सी चालकांच्या उत्पन्नावर गदा आली आहे. याबाबत अधिक सांगताना नागपुरातील कॅबचालक मिलिंद गाडगे म्हणाले,‘सीएनजी पंपांवर पूर्वीदेखील गर्दी असायची. पण, आता हा प्रतीक्षा कालावधी दोन तासांवर पोहोचला आहे. सीएनजी परवडणारा असला तरी पुरवठा अनिश्चित असल्याने आम्ही तात्पुरते पेट्रोलवर गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रांगेत वेळ घालवण्यापेक्षा महागडे इंधन परवडले, अशी स्थिती निर्माण झाली आहे.’टॅक्सी चालकांच्या मते, सीएनजी आणि पेट्रोलच्या खर्चात मोठी तफावत आहे. पण, वेळ वाचवण्यासाठी त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. ७ किलो सीएनजीसाठी साधारण ६३० रुपये लागतात, ज्यामध्ये गाडी २०० किमी धावते. पेट्रोलवर गाडी चालवण्याचा खर्च अंदाजे ७ रुपये प्रति किमी येतो.

    कंपनी म्हणते ‘ऑल इज वेल’
    नागपूर जिल्ह्यात सीएनजी वितरणाची जबाबदारी असलेल्या हरियाणा सिटी गॅस (एचसीजी) कडे २७ पंप आहेत. कंपनीला ‘गेल’कडून गॅसचा पुरवठा होतो. या परिस्थितीबाबत विचारणा केली असता, एचसीजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरवठ्यात कोणतीही अडचण नसल्याचा दावा केला आहे. गेल्या दोन दिवसांत खप कमी झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, युद्धजन्य परिस्थिती अधिक चिघळल्यास सरकारकडून निर्बंध लादले जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा