ढाबा, दुकान, हॉटेल, सिग्नल, रेल्वे स्थानकांसह, बांधकामाच्या ठिकाणी, वीटभट्टीवर सर्रास बालकामगारांना कामासाठी ठेवले जात असल्याचे प्रकार सातत्याने समोर येत आहेत. कमी पैशांत काम केले जात असल्यामुळे आजही ठाणे जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी बालकांना कामाला लावण्यात येत असल्याने प्रशासकीय यंत्रणांच्या कार्यक्षमतेविषयी संताप व्यक्त होत आहे. जोपर्यंत कामगार उपायुक्त कार्यालयाकडे तक्रार येत नाही, तोपर्यंत कारवाई करून बालकांची कामातून मुक्तता केली जात नसल्याची विदारक परिस्थिती या विभागात आढळते. बालकामगार प्रथा मोडीत काढण्यासाठी शासनस्तरावर सामाजिक संस्था, बालकल्याण समिती आणि कामगार उपायुक्त कार्यालयाच्या वतीने बालकामगार प्रथा विरोधी जागृती अभियान राबविले जाते. ठाणे स्थानक परिसरात सामाजिक संस्थेच्या वतीने जनजागृतीचे फलक, सह्यांची मोहीम आणि रॅली असे जनजागृतीपर उपक्रम राबविले जातात. मात्र, वर्षाला जेमतेम १० ते १२ धाडी टाकण्यात येत असून त्यामध्ये सातत्य नसल्यामुळे आजही बालकांची होरपळ सुरूच आहे. प्रशासनाने सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्यास मोठ्या प्रमाणात बालकांची या प्रथेतून मुक्तता होऊन ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकतील, असे मत बाल हक्क चळवळीचे अतुल देसाई यांनी व्यक्त केले आहे.
सर्वाधिक धाडी नवी मुंबई परिसरात:
कामगार उपायुक्त कार्यालयाच्या वतीने टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये सर्वाधिक धाडी या ठाणे जिल्ह्यातील नवी मुंबई, उल्हासनगर आणि कल्याण परिसरातील आहेत. तर, सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये नेपाळ, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, झारखंड, कोलकाता, कर्नाटक अशा राज्यांतील बालके अधिक आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील बहुतांश बालकांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रातील लातूर, बीड, पालघर, परभणी, उल्हासनगर, कल्याण परिसरातीलही काही बालक येथे मजुरी करताना आढळली आहेत.
पुनर्वसन कागदावरच!
धोकादायक उद्योग आणि प्रक्रियेतील १४ वर्षांखालील बालकामगारांची मालकाच्या छळातून त्वरित सुटका करून त्यांचा प्राथमिक ताबा घेण्यात यावा, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दलाची स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक महिन्यातून एकदा घेण्याचा नियम आहे. मात्र २०१५पासून २०१९पर्यंत एकही बैठक घेण्यात आली नसल्याचे प्रथम सामाजिक संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच, या मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
बालकामगारांविषयीच्या कृतीदलाचे सहायक कामगार आयुक्त हे सदस्य सचिव आहेत. त्यामुळे ते बैठक निश्चित करत असतात. याबाबतच्या बैठका होत असून अहवाल मांडला जात आहे. या महिन्यात २२ ऑगस्टला ही बैठक होत आहे. अशी माहिती ठाणे महिला व बाल विकास अधिकारी महिंद्र गायकवाड यांनी दिली.
अशी आहे आकडेवारी:
२०२० साली ६ धाडी टाकण्यात आल्या. या धाडीच १० बालकामगार व किशोरवयीन मुले- मुलींची सुटका करण्यात आली. तसेच या प्रकरणी ७ मालकांना अटक करण्यात आली आहे.
२०२१ साली टाकलेल्या ११ धाडीत ४४ बालकामगार आणि किशोरवयीन मुले- मुलींची सुटका करण्यात आली. तसेच या प्रकरणी पाच गुन्ह दाखल करण्याच आले असून १० मालकांना अटक करण्यात आली
२०२२ साली टाकलेल्या १२ धाडींमध्ये ३३ बालकामगार आणि किशोरवयीन मुले- मुलींची सुटका करण्यात आली. या प्रकरणी पाच गुन्हे दाखल असून २१ जणांना अटक करण्यात आली आहे
एकूण २९ धाडींमध्ये ८७ बालकामगारांची या चक्रातून सुटका करण्यात आली. तसेच एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या एकूण मालक आरोपींची संख्या ३८ आहे.