• Sat. Sep 21st, 2024

मोठी बातमी: अजितदादांनी तिखट प्रश्न विचारताच मुख्यमंत्री खवळले; बैठकीत वाद होताच फडणवीस धावले!

मोठी बातमी: अजितदादांनी तिखट प्रश्न विचारताच मुख्यमंत्री खवळले; बैठकीत वाद होताच फडणवीस धावले!

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातील एका रुग्णालयात २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ‘तिखट’ संवाद रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. उपमुख्यमंत्री पवार यांनी शुक्रवारी एका बैठकीदरम्यान थेट मुख्यमंत्री शिंदे यांनाच, ‘तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे,’ असा प्रश्न केल्याचे समजते. त्या वेळी शिंदे यांनीही पवार यांना त्याच टेचात उत्तर द्यायला सुरुवात केली असता, त्यावेळी बाजूला असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच हस्तक्षेप करीत हा विषय तिथेच थांबवल्याचे समजते.

मंत्र्यांची एक खासगी बैठक शुक्रवारी पार पडली. राज्यातील विविध प्रश्न, योजना आणि निर्णय यावर चर्चा सुरू होती. यावेळी सर्वच मंत्री उपस्थित होते. त्याचवेळी ठाण्यातील कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील मृत्यूंचा मुद्दा अजित पवार यांनी उपस्थित केला. घटना गंभीर आहे. काळजी घेतली पाहिजे, असे पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. पवार यांनी थेट राज्याच्या प्रमुखालाच प्रश्न विचारल्याने बैठकीला उपस्थित असलेले मंत्री अजित पवारांच्या या पवित्र्याने काही काळ आश्चर्यचकित झाल्याचे समजते. मुख्यमंत्र्यांनी पवारांना ठाण्याच्या रुग्णालयात झालेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली. रुग्णांचा मृत्यू कसा झाला? किती रुग्णांची प्रकृती कशी गंभीर होती, शेवटच्या क्षणी रुग्णालयात किती रुग्ण आले? रुग्णालयावर येणारा ताण आदीची माहिती देत शिंदे यांनी पवारांनाच्या प्रश्नांना उत्तर दिल्याचे समजते.

शरद पवारांकडून धनंजय मुंडेंच्या बंदोबस्ताची तयारी, अजितदादांकडून धनुभाऊंना तोडीस तोड जबाबदारी

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. साहजिकच या विषयाला वेगळे वळण लागू नये, हे आधीच ओळखून फडणवीस यांनी लगेचच वेगळा विषय काढून मूळ विषयाला बगल दिली.

शिवसेनेचे मंत्री, आमदार अस्वस्थ

अजित पवार यांच्या या प्रश्नामुळे मात्र, शिवसेनेचे मंत्री; तसेच आमदार अस्वस्थ झाल्याचे समजते. ‘महाविकास आघाडीत असतानाही अजित पवारांची अडचण होती आणि आताही अडचणच आहे,’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार या पार्श्वभूमीवर खासगीत देत आहेत. एकीकडे अजित पवारसमर्थक अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याचे फलक महाराष्ट्रभर लावत असताना, आता अशा प्रकारचे वाद व्हायला सुरुवात झाल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरच सरकारमधील समतोल राखण्याची जबाबदारी आल्याचीही चर्चा या निमित्ताने अधिकारी व भाजप आमदार, नेत्यांमध्ये या निमित्ताने सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed