भारत हा जगातील सर्वाधिक खाद्यतेल वापरकर्ता देश आहे. एकूण मागणीच्या ४० ते ४५ टक्केच खाद्यतेल देशात तयार होते. उर्वरित तेल आयात केले जाते. एकूण आयातीत जवळपास ६५ टक्के पामतेलाचा समावेश असतो. भारतात तयार होणाऱ्या ४५ टक्के खाद्यतेलात २५ टक्के सोयाबीन व त्यापाठोपाठ राइसब्रान (तांदळपासून) आणि भुईमुग यांचा समावेश असतो.
देशभरात तेलबिया पेरणीक्षेत्रात १० वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.६९ टक्क्यांचीच घट आहे. मात्र, भारतात सर्वाधिक मागणी असलेल्या सोयाबीन पेरणीत १० वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ०.९६ टक्के वाढ आहे. मागील वर्षीपेक्षाही १.१८ लाख हेक्टरवर सोयाबीनच्या पेरण्या अधिक झाल्याचे राष्ट्रीय खाद्यसुरक्षा मिशनच्या आकडेवारीत नमूद आहे. महाराष्ट्रातदेखील सोयाबीनच्या पेरण्या १७ टक्के अधिक क्षेत्रावर झाल्याची समाधानकारक स्थिती आहे.
‘भारतात खाद्यतेलासाठी भुईमुग, सोयाबीन व तांदळाच्या पेरण्या अत्यावश्यक असतात. एकूण खाद्यतेल मागणीत या तिन्ही प्रकारच्या तेलांचा वाटा जवळपास ३५ टक्क्क्यांचा घरात असतो. या स्थितीत या तिन्ही पिकांच्या पेरण्या ९० टक्क्यांहून अधिक झाल्या आहेत. मात्र सध्या पावसाने दिलेली ओढ काही प्रमाणात धोकादायक ठरू शकते. तेलबियांच्या प्रमुख पेरणीक्षेत्रात आठवडाभरात पावसाची नितांत गरज आहे’, असे याबाबत अखिल भारतीय खाद्यतेल महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी सांगितले.
संपूर्ण देशाला सोयाबीन व भुईमुगाच्या तेलबियांचा पुरवठा प्रामुख्याने महाराष्ट्रातून होतो. या दोन्हीचे पीक लातूर, नांदेड या मराठवाड्यातील भागासह विदर्भातही घेतले जाते. मात्र त्याच भागात सध्या पावसाची ओढ आहे. दुसरीकडे देशभरात तांदळाच्या पेरण्या मागील वर्षीपेक्षा १५.४३ टक्के अधिक आहेत. एकूण तेल मागणीत सुमारे आठ टक्के वाटा असलेल्या राइसब्रान तेलाच्या दृष्टीने ही समाधानकारक बाब आहे.
विदर्भ, संलग्न मराठवाड्यात पावसाची शक्यता
ऑगस्टच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये राज्यात फारसा पाऊस झालेला नाही. मात्र २० ते ३१ ऑगस्टदरम्यान विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच, विदर्भाच्या संलग्न असलेल्या मराठवाड्याच्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो. उर्वरित मराठवाड्यात मात्र फारशा पावसाची शक्यता आत्ताच्या मॉडेलनुसार वाटत नसल्याची माहिती पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. मेघगर्जनेसह पडणाऱ्या पावसामुळे सातत्यपूर्णता आणि सर्वदूरता या घटकांबद्दल प्रश्न निर्माण होतो.