या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ विठ्ठल मिसाळ (वय १७ वर्षे, रा. साउथ सिटी आदर्श कॉलनी तिसगाव असे आयुष्य संपवलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभचे वडील सैन्यात नोकरीला आहेत, तर आई गृहिणी आहे. सौरभला एक लहान बहीण आहे. सौरभचे वडील सैन्यात असल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना सुट्टी मिळाली होती. त्यामुळे ते घरी आले होते.
घरी आल्यानंतर त्यांनी गावाकडे आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र सौरभची बारावीची परीक्षा आणि निश्चित तयारी सुरू असल्यामुळे त्याला अभ्यास करण्यासाठी घरीच राहावं लागलं. यामुळे सौरभचे वडील आई आणि बहीण तिघे गावी गेले यावेळी सौरभ घरी एकटाच होता. दरम्यान सौरभची मावशी घरात शेजारीच राहते. यामुळे सौरभच्या जेवणाची जबाबदारी मावशीकडे होती.
सकाळी सौरभ घरीच होता. दुपारी क्लासला जातो असं त्याने त्याच्या काकांना सांगितलं होतं. मात्र तो दुपारी घरीच होता. सायंकाळी चार वाजता तो घरातच होता, मात्र मावशीला वाटलं की तो घरामध्ये आराम करत असेल. यामुळे तिने त्याला आवाज दिला नाही. मात्र बराच वेळ झाला सौरभ घराबाहेर पडलाच नाही. यामुळे काकांनी आवाज दिला असता प्रतिसाद आला नाही. खिडकीतून बघितले असता सौरभाने आपले जीवन संपवल्याचे दिसले.
या घटनेची माहिती एमआयडीसी वाळूज पोलिसांना देण्यात आली. पोलिसांच्या मदतीने त्याला घाटी रुग्णाला दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. सौरभने हे टोकाचे पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूचे नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार कासर्ले करीत आहेत.