• Sat. Sep 21st, 2024

राष्ट्रवादीत चाललंय काय? अजित पवारांच्या कृतीने पुन्हा चर्चांना उधाण, ठाण्यात गेले, पण…

राष्ट्रवादीत चाललंय काय? अजित पवारांच्या कृतीने पुन्हा चर्चांना उधाण, ठाण्यात गेले, पण…

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर प्रथमच बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार ठाण्यात दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाच्या उद्‌घाटन सोहळ्याला पवार यांनी हजेरी लावली. एकीकडे खुद्द अजित पवार यांनी मुंबईतील पक्षाच्या कार्यक्रमात ‘ठाण्याचा पठ्ठ्या’ असा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे नाव न घेता टीका केली होती. मात्र ठाण्यात येऊन अजित पवार यांनी आव्हाड यांच्यावर टीका करणे टाळल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांना ठाणे शहराध्यक्ष व माजी खासदार आनंद परांजपे आणि ठाण्यातील माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी जाहीर समर्थन देत आमदार जितेंद्र आव्हाड यांना ठाण्यात होम पिचवरच आव्हान दिले होते. त्यामुळे अजित पवार गटाच्या नवीन कार्यालयाच्या उद्‌घाटन सोहळ्यानिमित्त शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्‌घाटनाच्या कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात नजीब मुल्ला यांना उमेदवारी देणार का? या प्रश्नावर अजित पवार यांनी सध्या आम्ही लोकसभेवर लक्ष केंद्रित केले असल्याचे सांगत आव्हाडांचा उल्लेख टाळला. त्यामुळे अजित पवार यांच्या या भूमिकेने त्यांचे कार्यकर्तेही अचंबित झाले आहेत.

थांब ना, दम खा; पत्रकारांचे प्रश्नावर प्रश्न, अजित पवारांचा संताप

आव्हाडांच्या ट्वीटने चर्चा

ठाण्यातील अजित पवार यांच्या कार्यक्रमानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केवळ ‘आभार दादा…’ असे ट्वीट केल्याने चर्चांना अधिकच उधाण आले आहे. त्यांनी अजित पवार यांच्या कोणत्या भूमिकेवरून त्यांचे आभार मानले, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed