बेलवाडी गावात मंगळवार दि. १ रोजी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक पोलिस प्रशासन घटनास्थळी दाखल आहेत. मजुरांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी, पोकलेनच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
नेमकी घटना काय?
याबाबत अधिक माहिती अशी की, इंदापूर तालुक्यातील सणसर येथील विजय अंबादास क्षीरसागर यांच्या म्हसोबावाडी (ता. इंदापुर) गावाच्या हद्दीत कवडे वस्ती लगत जमीन गट नंबर ३३८ मध्ये असलेल्या विहिरीचं रिंग बांधकाम सुरु होते. मात्र, अचानक या विहिरीचा मुरूम कोसळला आणि त्यासोबत लावलेली रिंग देखील खाली कोसळली. त्यामुळे त्यावर काम करत असलेले मजूर देखील विहिरीत दबल्याची माहिती समोर आली आहे.
विहिरीमध्ये रिंग पडून व मुरूम ढासळून सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय.३५ वर्ष),जावेद अकबर मुलानी(वय. ३५ ), परशुराम बन्सीलाल चव्हाण(वय ३० वर्ष) मनोज मारुती सावंत( वय ४० वर्षे, सर्व रा. बेलवाडी, ता.इंदापूर, जि. पुणे )हे गाडले गेले आहेत.
रात्री अचानक घडलेल्या या घटनेने सर्वांची एकच धावपळ उडाली. दरम्यान, कामगारांना मुरूमाखालून काढण्यासाठी सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून स्थानिक नागरिक आणि पोलिस प्रशासन रात्रीपासून घटनास्थळी आहेत.