सकाळी नऊ वाजता शिवाजीनगर, निमसोड, सोहोली, कडेपूर ,नेर्ली आदी गावातील मानकऱ्यांना वाजत-गाजत ताबूताच्या ठिकाणी आणण्यात आले. त्यानंतर पूजा करून मानाचा सातभाई यांचा उंच ताबूत दुपारी उचलण्यात आला. येथून भेटी सोहळ्यास प्रारंभ झाला. हा ताबूत विजबोर्डजवळ येऊन थांबला. तेथे देशपांडे, हकीम, शेटे यांचे ताबूत येऊन मिळाले. हे सर्व ताबूत पाटील चौकात आणण्यात आले.
त्यानंतर बागवान यांचा उंच, आत्तार, शेटे यांचे ताबूत पाटील चौकात आणण्यात आले. त्यानंतर सातभाई पाटील, सातभाई बागवान, सातभाई आत्तार ,सातभाई हकीम,या उंच ताबूतांच्या भेटी दुपारी सव्वाबाराला झाल्या. त्यानंतर हिंदू मानकऱ्यांमार्फत मसूदमाला ताबूत व पंजे, बारा इमामचे पंजे, नालसाहेब यांचे पंजे , तांबोळी ,इनामदार व सुतार यांचे ताबूत आणले गेले. सर्व ताबूत माना प्रमाणे सुरेश बाबा देशमुख -मोहरम चौकात एकत्रित केले गेले. त्यानंतर दुपारी दीडला ताबूत उचलण्यात आले व मुख्य भेटीचा सोहळा सुरू झाला. डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या नेत्रदीपक सोहळ्यात गगनचुंबी ताबूत पाहून भाविक अक्षरशः मंत्रमुग्ध झाले होते . या ठिकाणी मानाप्रमाणे सर्व ताबूतांच्या भेटी झाल्या. हा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटकसह विशेषतः सांगली , सातारा, कोल्हापूर, सोलापूर ,पुणे जिल्ह्यातील भाविकांची मोठी गर्दी होती.
