कोकणात गोल्या काही दिवसांपासून पावसाचं थैमान सुरू होतं. शुक्रवारी काहीशी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, तरीही कोकणावर असलेलं दरडींचं संकट थांबायचं नाव घेत नाहीये. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभार्ली घाट शुक्रवारी सायंकाळी उशिरा दरड कोसळल्यामुळे बंद झाला होता. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यंत्रणेने तात्काळ युद्ध पातळीवर या ठिकाणी जेसीबी लावून ही दरड बाजूला केली आणि हा मार्ग मोकळा केला. पण, असे असले तरी या घाटातही आता दरडी कोसळू लागल्याने हा घाटही वाहतुकीसाठी पावसाळ्यात धोकादायक झाल्याचे स्पष्ट झाल आहे.
दरम्यान, रात्री उशिरा तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी तालुक्यात मळेवाडी हेदुलवाडी येथे रस्त्यावर झाड पडून पूर्णपणे वाहतूक बंद झाली होती. विजेच्या ताराही तुटल्या आहेत. सावंतवाडी शिरोडा हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला होता. मात्र, शुक्रवारी मध्यरात्री उशिरा हा मार्ग झाडं बाजुला करून वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.
यापूर्वी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र जोडणारा रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील आंबेनळी घाटही धोकादायक झाला आहे. महाड आणि पुणे जोडणारा वरंधा घाट अवजड वाहनासाठी पावसाळ्यात बंद करण्यात आला आहे. रत्नागिरी-कोल्हापूर जोडणारा आंबा घाटावर याच पावसाळ्यात दोन ते तीन वेळा दरड कोसळण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे कोकण ते पश्चिम महाराष्ट्र जोडणारे हे घाटमाथे दरडींच्या सावटाखाली आहेत. त्यामुळे या घाटमाथ्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना हाती घेण्याची वेळ आली आहे.
पर्यटन आणि व्यापार उद्योग यासाठी हे घाट कायमस्वरूपी सुरक्षित असणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे. या घाटांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण हे वाढलेल्या वृक्षतोडीमुळेच घडत असल्याचं मत पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केले जात आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या या खोऱ्यात वृक्षतोडीवरही वनविभागाने तातडीने अंकुश ठेवणे आवश्यक आहे.