• Sat. Mar 7th, 2026

    जमीनवाटपातील मोठा गैरव्यवहार उघड: त्या शेतजमिनी पुन्हा ताब्यात घेण्याचे कोर्टाचे आदेश, नेमका घोटाळा काय?

    जमीनवाटपातील मोठा गैरव्यवहार उघड: त्या शेतजमिनी पुन्हा ताब्यात घेण्याचे कोर्टाचे आदेश, नेमका घोटाळा काय?

    मुंबई : धरण किंवा अन्य सार्वजनिक प्रकल्पांसाठी जवळपास सहा दशकांपूर्वी भूसंपादन होऊन संबंधित शेतकऱ्यांना अंतिम भरपाई मिळालेली असतानाही अनेकांनी महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्ती पुनर्वसन कायद्यांतर्गत पर्यायी शेतजमिनीसाठी दावे दाखल केले. तसेच, त्यांना तसा कायदेशीर हक्क नसतानाही मोठमोठ्या जमिनींचे वाटप करण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार प्रथमच मुंबई उच्च न्यायालयात उघड झाला आहे. विशेष म्हणजे यातील अनेकांना उच्च न्यायालयाच्या आदेशांच्याच आधारे जमिनीचे वितरण झाले. मात्र, कायदेशीर तरतुदींबाबत उच्च न्यायालयाला अंधारात ठेवण्यात आल्याने तसे आदेश देण्यात आल्याचेही समोर आले आहे.

    कोयना धरण प्रकल्पग्रस्त शिवप्रताप पाटणकर यांनी पर्यायी जमिनीबाबत न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नाही म्हणून अवमान याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीनंतर हा घोटाळा अत्यंत धक्कादायक असल्याचे न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने नमूद केले. यापूर्वी रायगड जिल्ह्यात व पनवेल तालुक्यात पर्यायी जमिनींची मागणी करणाऱ्या अनेक कोयना धरणग्रस्तांच्या याचिका आल्या होत्या. शिवाय पुणे जिल्ह्यातील १९६१मधील वीर प्रकल्पाने बाधित व्यक्तींच्या एकत्रित याचिकांचा प्रश्न नुकताच न्यायालयासमोर आला होता. त्यातील सुनावणीत हा अवैध प्रकार निदर्शनास आल्याने याच खंडपीठाने १२ जुलैला त्या याचिका फेटाळल्या.

    ‘१९६१मध्ये पर्यायी जमिनींबाबत पुनर्वसन कायदेच अस्तित्वात नव्हते. त्यामुळे तेव्हाच्या प्रकल्पबाधितांना नंतरचे कायदे पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू होऊन जमीन वाटप होऊच शकत नाही. परिणामी प्रकल्पबाधित असल्याच्या नावाखाली अनेकांनी सरकारी जमिनी बळकावल्या असतील आणि ते अवैध लाभार्थी आहेत. त्यामुळे ही बाब अत्यंत चिंतेची आहे. राज्य सरकारला या प्रकरणाची चौकशी करावी लागेल. तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला नसला तरी असे जमीनवाटप हे अवैधच ठरते. त्यामुळे त्या शेतजमिनी सरकारला पुन्हा ताब्यात घ्याव्या लागतील. सरकारी जमिनींची अशी खैरात केली जाऊ शकत नाही,’ असा गंभीर शेराही खंडपीठाने आपल्या आदेशात नोंदवला आहे.
    यासिन मलिकप्रकरणी मोठी कारवाई; तिहार जेलचे ४ अधिकारी सस्पेंड, काय कारण?
    नेमका घोटाळा काय?

    सार्वजनिक प्रकल्पांसाठी राज्य सरकारने भूसंपादन कायदा, १८९४ या कायद्यांतर्गत १९६१च्या सुमारास अनेक जमिनींचे भूसंपादन केले आणि त्याबदल्यात जमीन मालकांना आर्थिक भरपाई दिली. महाराष्ट्र प्रकल्प विस्थापित व्यक्ती पुनर्वसाहत कायदा-१९७६, महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्ती पुनर्वसन कायदा-१९८९ आणि महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्ती पुनर्वसन कायदा, १९९९, हे तीन कायदे नंतर अस्तित्वात आले. त्या कायद्यांतील तरतुदींप्रमाणे जमिनीबाबत आर्थिक भरपाई दिल्यानंतर त्या भरपाईच्या रकमेपैकी ६५ टक्के रक्कम संबंधित जमीन मालकाने सरकारकडे परत जमा केली तर तो पर्यायी जमिनीसाठी पात्र ठरतो. मात्र, हे कायदे १९६१च्या सुमारास भूसंपादन झालेल्या जमिनींबाबत लागूच होत नाहीत. तरीही अनेकांनी अर्ज करून पर्यायी जमिनी मिळवल्या, असे न्यायालयासमोर उघड झाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed