• Wed. Mar 11th, 2026
    अजितदादांचा गट ‘या’ तीन खात्यांवर अडला, भाजप-शिंदे गट ऐकेनात, बैठका निष्फळ

    मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच आता शिंदे-फडणवीस सरकारचा आणखी एक मंत्रिमंडळ विस्तार होऊ घातला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी पार पडण्याची शक्यता आहे. मात्र, खातेवाटपाचा तिढा हा काही केल्या सुटायला तयार नाही. मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांवरुन सध्या रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांचा गट तीन महत्त्वाच्या खात्यांवर अडून बसला आहे.

    Bharat Gogawale: मी अदिती तटकरेंपेक्षा चांगलं काम करेन, शेवटी महिला-पुरुषांमध्ये फरक असतोच ना: भरत गोगावले

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रथम मंत्रिमंडळ विस्तार करा आणि नंतर योग्यवेळी खातेवाटप करु, असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर खातेवाटपाची चर्चा सुरु झाली होती. गेल्या दोन दिवसांमध्ये मुख्ममंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात दोन मॅरेथॉन बैठका झाल्या आहेत. वर्षा बंगल्यावर रात्रीच्यावेळी हे तिन्ही नेते बराच काळ राजकीय खलबतं करत होते. मात्र, खातेवाटपाचा तिढा काही सुटलेला नाही. अजित पवार यांचा गट महसूल, अर्थ आणि जलसंपदा या तीन खात्यांसाठी अडून बसला आहे. महसूल खाते हे सध्या राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे आहे. तर अर्थ आणि जलसंपदा ही दोन्ही खाती सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत. मात्र, अजित पवार यांना अर्थखाते देण्यास शिंदे गटाच्या आमदारांचा तीव्र विरोध आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी त्यांच्या गटाच्या आमदारांनी तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार हे निधीवाटपात भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. आता अर्थखाते पुन्हा अजित पवार यांच्याकडेच गेल्यास ते पूर्वीप्रमाणेच कारभार करू शकतात, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे आता यावर काय तोडगा निघणार, याकडे राजकीय वर्तुळाच्या नजरा लागल्या आहेत.

    Cabinet Expansion: दोघांत तिसरा, मंत्रिपद विसरा; भाजप आमदारांची व्यथा, मोदी@९ अभियानही थांबवलं

    खातेवाटपाचा तिढा दिल्ली दरबारी, अजित पवार, शिंदे आणि फडणवीस दिल्लीला जाणार?

    दोन-तीन बैठका होऊनही खातेवाटपाचा तिढा काही सुटायला तयार नाही. अजित पवार यांचा गट अर्थमंत्रीपदासाठी आग्रही आहे. परंतु, शिंदे गटाचा त्याला विरोध असल्याने हा तिढा काही सुटायला तयार नाही. त्यामुळे आता हा वाद दिल्लीत भाजपश्रेष्ठींच्या दरबारात जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज दुपारी चार वाजता दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. दिल्लीत अमित शाह यांच्या उपस्थितीत या तिन्ही नेत्यांची बैठक होऊ शकते.

    धुळ्यातला कार्यक्रम आटोपला, एकाच गाडीतून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचा जळगाव विमानतळापर्यंत प्रवास!

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed