हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, राजगड, पुणे, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुढचे काही दिवस पावसाचा जोर कमी असेल असा अंदाज आहे. तर हवामान खात्याकडून राज्यातील २४ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण विभागात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तापमानामध्ये वाढ जाणवू लागली असून, मुंबईत आठवड्याची सुरुवात उकाड्याने झाल्याची भावना मुंबईकरांनी सोमवारी व्यक्त केली.
या आठवड्यात मुंबईत फारसा पाऊस नसल्याने उकाड्याची जाणीव सहन करायला लागेल, अशी शक्यता आहे. मात्र ही तापमानवाढ फार नसेल, असा अंदाज आहे. ठाणे जिल्ह्यातही पुढील पाच दिवसांमध्ये हलक्या ते मध्यम सरींचीच शक्यता आहे. या तुलनेत दक्षिण कोकणाच्या तुरळक भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील चार ते पाच दिवस पाऊस संमिश्र राहील, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.
या २४ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता…
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नाशिक, नंदूरबार, धुळे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून या वेळी वादळी वारेही वाहतील.
मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. या परिस्थितीमध्ये १३ जुलैनंतर सुधारणा होऊ शकते. तोपर्यंत चढ्या तापमानाचा ताप राज्यात अनेक ठिकाणी जाणवण्याची शक्यता आहे.