प्राथमिक माहितीनुसार, अभिजित पानसे आणि संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी भांडूप ते दादर असा एकत्र प्रवास केला. त्यानंतर पानसे हे संजय राऊत यांच्यासोबत प्रभादेवी येथील सामना कार्यालयात पोहोचले. काही मिनिटं याठिकाणी थांबल्यानंतर अभिजित पानसे आपल्या गाडीने माघारी निघाले. यावेळी त्यांनी मी वैयक्तिक कारणासाठी संजय राऊतांना भेटलो, असे सांगितले. परंतु, यानंतरच्या घडामोडी रंजक होत्या. ‘सामना’च्या कार्यालयात चर्चा झाल्यानंतर संजय राऊत आणि अभिजित पानसे आपापल्या गाड्या घेऊन बाहेर पडले. यानंतर संजय राऊत थेट मातोश्रीवर गेले. तर अभिजित पानसे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ येथे गेले. त्यामुळे मनसेकडून उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चेला आणखीनच उधाण आले.
राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर अभिजित पानसे शिवतीर्थच्या बाहेर उभे होते. तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना गाठत पानसे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. तुम्ही मनसेकडून युतीचा प्रस्ताव घेऊन संजय राऊत यांच्याकडे गेला होतात का, असा प्रश्न पानसे यांना विचारण्यात आला. या गोष्टीचा अभिजित पानसे यांनी साफ इन्कार केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी मागणी होत असल्याची गोष्ट मला आत्ता समजली आहे. पण मला वाटतं की, सध्याचा घोडेबाजार पाहून लोकांचा राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर विश्वास बसला आहे. कालपर्यंत सख्खे वैरी असणारे लोक आज भाऊ म्हणून सत्तेत बसले आहेत. संजय राऊत यांच्याकडे मी माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो.
मी राऊतांना भेटण्यासाठी प्रभादेवीपर्यंत आलो होतो. त्यामुळ आता दादरला जाऊन शिवतीर्थावर राज ठाकरे यांना भेटावे म्हणून मी इकडे आलो. मी कोणताही युतीचा प्रस्ताव घेऊन संजय राऊत यांच्याकडे गेलो नव्हतो. मनसे कोणासोबत जाणार नाही, ही राज ठाकरे यांची भूमिका आहे. पण अशी युती कधी झालीच तर त्यावर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे भाष्य करतील. ही खूप मोठी राजकीय घडामोड आहे. एका बैठकीत असे निर्णय घेतले जात नाहीत, असे अभिजित पानसे यांनी सांगितले.