• Sun. Mar 15th, 2026
    अजित पवार भाजपसोबत, आता मिशन बारामती फत्ते होणार? गोपीचंद पडळकर काय म्हणाले, जाणून घ्या

    बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश चौफेर प्रगती करत आहे. राज्यात भाजप-सेना सरकारने गेल्या एक वर्षात अनेक धडाडीचे निर्णय घेतले आहेत. ही बाब लक्षात आल्याने राष्ट्रवादीतील काही लोक आमच्या सोबत आले असतील. त्यांचे स्वागत आहे, अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर यांनी रविवारच्या सत्तानाट्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पडळकर हे मोदी @ ९ कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बारामतीत होते. त्यानंतर त्यांनी बारामतीत पत्रकारांशी संवाद साधला.
    अजित पवारांची उपमुख्यमंत्रीपदाची शपथ, पृथ्वीराज चव्हाणांचं मुख्यमंत्री पदाबाबत मोठं वक्तव्य
    पडळकर म्हणाले, रविवारी राष्ट्रवादीतील काहींनी शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात चौफेर विकास सुरू आहे. रस्त्यांच्या बाबतीत जगात दुसऱ्या क्रमांकावर आपला देश पोहोचला आहे. मोदी हेच सक्षम नेतृत्व असल्याचे लक्षात आल्याने राष्ट्रवादीतील काहींनी शपथ घेतली आहे. त्यांचे स्वागत आहे. राष्ट्रवादीतील दुफळीबाबत ते म्हणाले, हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत विषय आहे. एका दिवसात सगळ्या बाबी समोर येतील असे काही नाही. अजून बऱ्याच गोष्टी पुढे यायच्या आहेत. त्यानंतर या विषयावर बोलता येईल. शरद पवार यांनी जनतेत जात पक्षाची मोट पुन्हा बांधणार असल्याचे वक्तव्य केले होते.

    राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; पक्ष कार्यालयाबाहेरील नेत्यांच्या फोटोला काळं फासत निषेध

    त्यासंबंधी पडळकर म्हणाले, ते गेली ४० वर्षे जनतेतच आहेत. १९९९ ला पक्ष स्थापन केल्यापासूनही जनतेत आहेत. परंतु त्यांना कधीही एकहाती बहुमत मिळविता आलेले नाही. अजित पवार यांच्या सत्तेतील सहभागामुळे भाजपच्या मिशन बारामतीचे काय होणार या प्रश्नावर ते म्हणाले, देशात भाजपशिवाय पर्याय उरलेला नाही. भाजपने विकासाबरोबरच सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. पक्ष आणखी जोमाने लोकांमध्ये जात संघटन मजबूत करेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed