कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ रविवारी २ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झालाय. तिघेही मुंबई येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळत असून नांदेड येथे बकरी ईद साजरी करण्यासाठी आले होते, अशी माहिती मिळत आहे. ते नांदेडहून हुंडाई वेरना कार क्रमांक एमएच ०४ जेव्ही २४३० मधून मुंबईकडे निघाले होते. कोपरगाव तालुक्यात धोत्रे शिवारात पोहचल्यानंतर चालकाचा हुंडाई वेरना कारवरचं नियंत्रण सुटल्याने ही गाडी पुलाच्या कठड्याला जावून धडकली. ही धडक एवढी जोराची होती की कारच्या एअरबॅग उघडूनही तिघांचा मृत्यू झालाय.
जावेद अख्तर सलीमुद्दिन (वय – ५८), शमीम बेगम (वय – ५१) आणी अक्रमुद्दीन (वय – २२) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. दिवसागणिक समृद्धी महामार्गावर अपघातांची संख्या वाढत चालली असून ठोस उपाययोजना करण्याची आणि नागरिकांनीही गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कालच बुलढाणा येथे खाजगी बसच्या अपघातात २५ जणांनी आपला जीव गमावला ती घटना ताजी असतानाच पुन्हा समृध्दी महामार्गावर अपघात घडल्याने वाहनांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.