जल जीवन मिशन अंतर्गत गंगापूर-वैजापूर तालुक्यातील ३७३ गावांच्या ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार प्रवीण दरेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे, संजय केनेकर, शिरीष बोराळकर उपस्थित होते. आमदार प्रशांत बंब यांनी प्रास्तविकात ‘मोदी @ ९’ कार्यक्रमांची माहिती दिली. मोदी यांच्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात केंद्र सरकारने केलेल्या विकास कामाची माहिती देऊन सुमारे वीस हजार वैयक्तिक लाभार्थ्यांना लाभाच्या योजनांचा लाभ मिळवून दिल्याचे सांगितले.
फडणवीस म्हणाले, ‘शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सरकार स्थापन केले. एक वर्षांपूर्वी आजच्या दिवशी सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात परिवर्तन झाले. आज मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाले आहे. या नऊ वर्षांत मोदी यांनी महाराष्ट्राला खूप काही दिले आहे. त्यांनी राज्याला २५ लाख घरे दिली. सव्वा कोटी नागरिक मोदी यांच्यामुळे स्वतःच्या घरात राहू लागले आहे. त्याचबरोबर मोदी यांनी ७१ लाख लोकांना आरोग्यसेवा दिली आहे.’
पवारांवर टीका
देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये शाब्दिक द्वंद्व सुरू आहे. या कार्यक्रमात फडणवीस यांनी पवार यांच्यावर खोचक टीका केली. ते म्हणाले, ‘छत्रपती संभाजीनगर हे नाव शरद पवार यांना मान्य नाही. या शहराचे नाव तुम्ही काहीही ठेवले, तरी मी त्याला औरंगाबादच म्हणणार. मात्र, शरद पवार यांनी कितीही औरंगाबाद म्हटले तरी छत्रपती संभाजी महाराजांना आमच्या हृदयातून कोणीच काढू शकत नाही. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान आम्ही कधीच विसरू शकत नाही.’