छगन भुजबळ यांनी मुलाखतीत बोलताना सांगितले की, तेव्हा शिवसेनेत फक्त जायचा रस्ता होता, बाहेर यायचा रस्ता नव्हता. शिवसेना पक्षातून बाहेर पडायचं म्हणजे जीवाची जोखीम होती. मी नागपूरमध्ये असताना शिवसेनेविरोधात बंड पुकारले. त्यानंतर मी नागपुरहून मुंबईत आलो. मी सांताक्रुझ विमानतळावर उतरलो तिथपासून ते माझगावला जाईपर्यंत रस्त्यांवर काचांचा खच पसरला होता. मी त्याकाळी कुठेही गेलो की, बाटल्या, दगडांचा मारा होत असे. मला आठवतं, मी काँग्रेसमध्ये असताना घाटकोपरला मिटिंग होती. ती मिटींग सुरु झाल्यावर जी तुफान दगडफेक सुरु झाली, त्यामध्ये अनेकांची डोकी फुटली. मी कुठेही गेलो की, दगडफेक व्हायची अशी परिस्थिती होती. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. कदाचित शिवसेनेत अधिक लोकशाही आल्यामुळे तसे झाले असावे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
त्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडणं अत्यंत कठीण होतं. त्यानंतर मी ९१ साली ओबीसींचा मुद्दा हाती घेतला आणि महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली. मंडल कमिशनच्या मुद्द्यावरुन माझ्यात आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात दरी निर्माण झाली होती. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी असा मुद्दा घेतली की, पोटाल जात नसते. ते त्यांचं मत होतं. त्यामुळे मी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. एकनाथ शिंदे ज्यांना गुरु मानतात ते आनंद दिघेही आम्ही पक्ष सोडला तेव्हा नागपूरला होते. त्यावेळी पहिले ३६ सह्या होत्या, मग बरोबर येताना १८ लोक आले. मग त्याची नोंद झाली. मग १८ पैकी ६ लोक परत गेले. मग आम्ही १२ जण शेवटपर्यंत राहिलो. त्यावेळी मधुकरराव चौधरी यांनी एक तृतीयांश आमदारांच्या संख्येप्रमाणे निकाल दिला, तो निकाल सर्वोच्च न्यायालयानेही उचलून धरला होता, अशी आठवण छगन भुजबळ यांनी सांगितले.